११ हजार ५१८ पर्यटकांची अभयारण्यात जंगल सफारी
By Admin | Updated: July 9, 2014 23:35 IST2014-07-09T23:35:32+5:302014-07-09T23:35:32+5:30
जंगलात गेले आणि वाघ दिसला नाही तर पर्यटकांचा ‘मूड आॅफ’ होतो. कित्येकदा गेल्यानंतर कधीतही एखाद्या वेळी वाघोबांचे दर्शन होते व तो प्रसंग जीवनातला अविस्मरणीय प्रसंग ठरतो.

११ हजार ५१८ पर्यटकांची अभयारण्यात जंगल सफारी
गोंदिया : जंगलात गेले आणि वाघ दिसला नाही तर पर्यटकांचा ‘मूड आॅफ’ होतो. कित्येकदा गेल्यानंतर कधीतही एखाद्या वेळी वाघोबांचे दर्शन होते व तो प्रसंग जीवनातला अविस्मरणीय प्रसंग ठरतो. मात्र यंदाचा उन्हाळा जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना आंबड व गोड अशा आठवणींचा ठरला. अनेकांना वाघोबा व अन्य प्राण्यांचे दर्शन झाले. सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी यंदा मार्च, एप्रिल व मे या मुख्य तीन महिन्यांत ११ हजार ५१८ पर्यटकांनी जंगलसफारी केली. यातून वन विभागालाही सुमारे तीन लाख ९१ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
आजच्या स्थितीत सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात राहून नागरीक वैतागले असून त्यांचा कल आता निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी वळत आहे. त्यामुळे हौसी लोकं आपल्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी आता अभयारण्यांकडे वळू लागले आहेत. त्यातच नागझिरा आता व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती वाढली आहे. शिवाय विविध प्रजातींच्या देशी-विदेशी पक्ष्यांचे वस्तीस्थान असलेल्या नवेगाव अभयारण्याचेही यात वेगळेच महत्व आहे. जिल्ह्याला लाभलेले देवाचे हे दोन वरदान म्हणूनच त्यांची ओळख आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ््याची चाहुल लागताच जंगल सफारीचा सिजन सुरू होतो. उन्हाळ््याचे मार्च, एप्रिल व मे हे तीन महिनेच जंगल सफारीसाठी महत्वाचे मानले जातात व या काळातच सर्वाधीक पर्यटक अभयारण्यांना भेट देण्यासाठी निघतात. जवळील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसलीसह जिल्ह्यातील नागझीरा व नवेगाव अभयारण्य देशाच्या नकाशात ख्याती प्राप्त आहे. यामुळे मोठ्या संख्येत पर्यटकांची धाव याकडे असते. त्यात नागझिरात वाघोबाचे वास्तव्य असल्याने दूरवरून पर्यटक नागझिराला भेट देतात. मात्र प्रत्येकालाच वाघोबाचे दर्शन होणार असे नाही. कित्येकांना तर हरीण, रान रेडे, मोर यासारख्या वन्यप्राण्यांवरच समाधान मानून परतावे लागते.
पर्यटकांच्या आगमनाने वन विभागाचेही चांगलेत फावले. मार्च, एप्रिल व मे या तीनही महिन्यांची बेरीज केल्यास ११ हजार ५१८ पर्यटकांनी जंगल सफारी केली असून यासाठी १८४५ वाहनांनी जंगलात प्रवेश केला होता.
अशाप्रकारे वाहन व पर्यटकांकडून वन विभागाला सुमारे तीन लाख ९१ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ते काही असो, पर्यटक आले व त्यांनी जिल्ह्यातील अभ्यारण्यांत येऊन आनंद लुटला. यात कित्येकांना वाघोबा व अन्य वन्य प्राणी दिसले. कित्येकांनी त्यांच्या जिवनातला हा क्षण क्लीक करून आठवणी सोबत नेल्या. हीच बाब येथील वन व वन्यजीव सृष्टीसाठी महत्वाची आहे. (शहर प्रतिनिधी)