वसतिगृह सोडून तो कचऱ्यात शोधतोय सुख
By Admin | Updated: May 22, 2016 01:31 IST2016-05-22T01:31:28+5:302016-05-22T01:31:28+5:30
सालेकसानजीक बाबाटोली येथे पेढाऱ्यांची मुले व अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मोलाचे पाऊल उचलत निवासी वसतिगृह सुरू केले.

वसतिगृह सोडून तो कचऱ्यात शोधतोय सुख
सोल्युशनची घातक सवय : वडील नसलेल्या अजयला आईनेही सोडले वाऱ्यावर
विजय मानकर सालेकसा
सालेकसानजीक बाबाटोली येथे पेढाऱ्यांची मुले व अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मोलाचे पाऊल उचलत निवासी वसतिगृह सुरू केले. त्या मुलांना सर्व आवश्यक सोयीसुविधा दिल्या, बाबाटोली येथील बेघर, अनाथ, पेंढाऱ्यांची मुले याचा पुरेपूर लाभ घेत आहेत. परंतु काही मुले शिक्षणाच्या व सर्वसामान्य जीवन जगण्याचा प्रवाहात येण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यापैकीच एक असलेल्या अजय नावाच्या मुलाची कहाणी प्रतिनिधीक स्वरूपात पडद्यामागील खरे चित्र दाखविते.
बाबाटोली येथील लोकांची दिनचर्या बघितली तर ते सकाळी उठून भीख मागायला जाणे किंवा काही छोट्या वस्तु विकून अर्थार्जन करण्यासाठी जातात. इकडे त्यांची मुलेसुध्दा गावात भीक मागत फिरत असतात. काही मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अशा वस्तुंचा शोध घेतात की ज्याला विकून त्यांना थोडे पैसे मिळतील. त्या पैशाने डोक्याला झिनझिण्या आणणाऱ्या पदार्थाची नशा करणे, गरज वाटल्यास कधी खाऊ घेणे यात त्यांचा पूर्ण दिवस जात असतो.
सालेकसा येथील पंचायत समिती परिसरात शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर एक मुलगा कचऱ्यात आपले सुख शोधताना दिसून आला. त्या मुलाला विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव अजय सांगितले. तो बाबाटोली येथे राहतो. जेव्हा त्याच्या आई वडीलांबद्दल विचारले तर तो म्हणाला की, त्याला वडीलाबद्दल काहीच माहीत नाही. वडीलांना त्याने पाहिलेही नाही. आई आहे ती मोळ्या विकण्याचे काम करते, ती पण केव्हा जाते केव्हा येते काही निश्चित नसते.
जेव्हा त्याला शाळा शिकतो की नाही असे विचारले तर त्याने सांगितले, त्याचे नाव वसतिगृहात दाखल आहे. मग वसतिगृह सोडून असे कचऱ्यात का भटकत आहे? असे विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. परंतु माहीती काढली असता असे समजले की, वसतीगृहात सर्व सोयी सुविधा मिळतात, शिक्षण मिळते, परंतु त्यांची नशा करण्याची सवय पूर्ण होत नाही. आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असून घरी जाण्याचा नावावर ही मुले आपली नशा पूर्ण करण्यासाठी कचऱ्यातील वस्तू वेचण्याची घाणेरडी कामे करीत असतात. यामुळे त्यांची दिनचर्या भयावह झाली आहे.
घाणीत वावरणे, घाण असलेले फाटलेले कपडे घाणले, आंघोळ मुळीच न करणे, दिवसभर दोन चार रुपयासाठी भटकत राहणे असा त्यांचा दिनक्रम असतो. पंचायत समिती परिसरात अजयशी संपर्क झाला असता पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे यांनी अजयसोबत हितगुज करण्याचा प्रयत्न केला, परंतु घाबरलेला अनाथ अजय कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देऊ शकला नाही. शेवटी वाघमारे यांनी त्याला खाऊसाठी पैसे दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले व तो तसाच कचऱ्यात वस्तु शोधण्यासाठी निघून गेला.
सामाजिक संस्थाही हतबल
या अजयला पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे मुलांना वाईट सवय लागली की त्यांना चांगल्या सवईसुध्दा आवडत नाही आणि त्यांचे जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यापूर्वीच अंधार आणखी पडद होत जातो. सामाजिक संस्थाही अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात हतबल ठरत आहेत.