वादग्रस्त तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रकरण चिघळणार
By Admin | Updated: May 27, 2015 00:57 IST2015-05-27T00:57:34+5:302015-05-27T00:57:34+5:30
जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्यांपैकी चार तहसीलदार आपापल्या ठिकाणी रुजू झाले आहेत.

वादग्रस्त तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रकरण चिघळणार
गोंदिया : जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्यांपैकी चार तहसीलदार आपापल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. मात्र देवरीचे तहसीलदार संजय टिळक यांना पुन्हा तिरोड्यात देण्याचे प्रकरण सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले असून त्यामुळे अद्याप त्यांना देवरीतून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या जिल्ह्यांतर्गत तर एका तहसीलदाराची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली. यात पूर्वी तिरोडा येथेच असणारे संजय नागटिळक यांना त्यांच्याविरूद्ध वाढलेल्या तक्रारीनंतर देवरीत पाठविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्यांची बदली तिरोड्यात केल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आपल्यासाठी अनाकलनिय असून वरिष्ठ स्तरावरूनच हा बदलीचा आदेश आल्याचे सांगण्यात आले. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत चौकशी केली असता मंत्रालय स्तरावर हालचाली झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय स्तरावर या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक यांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
याप्रकरणी नागटिळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपण तिरोड्यात रूजू होण्यास आग्रही आहे ही बाब चुकीची असल्याचे सांगून दुसरे कोणी तिथे जाण्यास इच्छुक असेल तर आपल्याला हरकत नाही, असे स्पष्ट केले.(जिल्हा प्रतिनिधी)