३८,४२१ हेक्टरवर सिंचनाचे उद्दिष्ट
By Admin | Updated: June 16, 2014 23:33 IST2014-06-16T23:33:58+5:302014-06-16T23:33:58+5:30
रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची योग्य व्यवस्था करवून देत त्यांची वेळीच मदत करणाऱ्या पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठीही नियोजन केले आहे. त्यात ३८ हजार ४२१ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचे

३८,४२१ हेक्टरवर सिंचनाचे उद्दिष्ट
खरिपासाठी नियोजन : पाटबंधारे विभागाचे ६४ जलस्त्रोत सज्ज
कपिल केकत - गोंदिया
रबी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाची योग्य व्यवस्था करवून देत त्यांची वेळीच मदत करणाऱ्या पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठीही नियोजन केले आहे. त्यात ३८ हजार ४२१ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाचे उद्दिष्ट ठरविले असून यासाठी जिल्ह्यातील ६४ जलस्त्रोतांचा वापर केला जाणार आहे.
मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व जुन्या मालगुजारी तलावांचा यासाठी वापर केला जाणार आहे. यंदाच्या पावसाळ््यात हे सर्व प्रकल्प भरतील असे गृहीत धरून तसेच मागील अनुभवाच्या आधारे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यातील काही जलस्त्रोतांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षेत्राचे सिंचन करावे लागणार असल्याचे नियोजनातून दिसते.
जिल्ह्यातील शेतकरी वर्ग आजही वरथेंबी पाण्यावर अवलंबून आपली शेती करतो. पावसावरच त्यांचा खेळ असल्याचे दरवर्षी बघावयास मिळते. अशात मात्र पाटबंधारे विभागाकडून जमेल तेवढे पाणी पुरवून सहकार्य केले जात असल्याचे दिसून येते. रबी हंगामात या विभागाने मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करून शेतकऱ्यांची मदत केली. तर खरीपाच्या हंगामातही विभागाने आपली तत्परता दर्शवून खरिपासाठीचे नियोजन करून घेतले आहे.
यासाठी पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व जुन्या मालगुजारी तलावांच्या आधारे खरिपाचे किती क्षेत्र सिंचित करावे हे ठरवून घेतले आहे. अर्थात पावसाळ््यात पूर्ण प्रकल्प भरतील असे गृहीत धरून व मागील अनुभवाच्या आधारेच हे नियोजन करण्यात आले आहे.
पाटबंधारे विभागाने खरीप हंगामासाठी केलेल्या ३८ हजार ४२१ हेक्टर सिंचनाच्या नियोजनात सर्वाधिक २० हजार ८१४ हेक्टर क्षेत्र मध्यम प्रकल्पातून, ११ हजार ७४६ हेक्टर क्षेत्र लघु प्रकल्पातून तर पाच हजार ८६१ हेक्टर क्षेत्रात जुन्या मालगुजारी तलावांमधून सिंचन केले जाणार आहे.
यातील मध्यम प्रकल्प बघावयाचे झाल्यास बोदलकसा प्रकल्पातून चार हजार १५१ हेक्टर, चोरखमारा पाच हजार ३०८ हे., चुलबंद तीन हजार हे., खैरबंधा पाच हजार ३३७ हे., मानागड ९६२ हे., रेंगेपार ९५२ हे. व संग्रामपूर मध्यम प्रकल्पातून एक हजार १०४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात येणार आहे. तसेच लघु प्रकल्पांत आक्टीटोला लघु प्रकल्पातून ५६१ हे., भदभद्या ५८५ हे., डोंगरगाव खजरी १९८ हे., गुमडोह ४५५ हे., हरी ३१६ हे., कालीमाटी २०४ हे., मोगरा ८१ हे., नवेगावबांध चार हजार तीन हे., पिपरीया ४२८ हे., पांगडी ७९० हे., रेहाडी २२५ हे., राजोली २७० हे., रिसाला एक हजार ६२६ हे., सोनेगाव २५७ हे., सालेगाव ८९२ हे., सेरपार २०४ हे., वडेगाव १६८ हे. व जुनेवानी लघु प्रकल्पातून ३०८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाणार आहे.
याशिवाय पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या जुन्या मालगुजारी तलावांची आजही साथ लाभणार आहे.
यातील भानपूर तलावातून २४१ हेक्टर, बोपाबोडी ११९ हे., भिवखिडकी १२८ हे., चान्नाबाक्टी १६२ हे., चिरचाळबांध ११४ हे., चिरचाडी २०१ हे., धाबेटेकडी १६९ हे., फुलचूर १०१ हे., गोठणगाव १६४ हे., गिरोला १३७ हे., गंगेझरी २६७ हे., कवठा ७७ हे., कोहलगाव ११९ हे., खैरी ११६ हे., कोसबी बकी १३२ हे., ककोडी १५५ हे., खमारी १३६ हे., काटी ९५ हे., कोसमतोंडी २१५ हे., कोकणा ९९ हे., खोजशिवनी १९० हे., खाडीपार ८६ हे., लेंडेझरी १०४ हे., माहूली १२० हे., मालीदुंगा १३६ हे., मुंडीपार १३१ हे., मेंढा १३१ हे., मोरगाव १७९ हे., माहुरकुडा १२७ हे., निमगाव १६१ हे., नांदलपार १५३ हे., पळसगाव/सौंदड १६१ हे., पालडोंगरी २५७ हे., पळसगाव डव्वा १२३ हे., पुतळी १५१ हे., सौंदड ३०९ हे., तेढा १५९ हे., ताडगाव तलावातून २१७ हेक्टर क्षेत्रावर सिंचन करण्याचे उद्दीष्ट पाटबंधारे विभागाने ठरविले आहे.
यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला तरी पाटबंधारे केलेल्या या नियोजनामुळे शेतीला वेळीच पाणी मिळून पिकांना ते लाभदायी ठरणार आहे.