टॉवर्स देताहेत आजाराला आमंत्रण
By Admin | Updated: June 14, 2014 23:42 IST2014-06-14T23:42:08+5:302014-06-14T23:42:08+5:30
गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची

टॉवर्स देताहेत आजाराला आमंत्रण
नियमांना बगल : शहरात आहेत २५ पेक्षा अधिक टॉवर
गोंदिया : गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु शहरातील बहुतांश टॉवर बेकायदेशीररित्या उभे आहेत. ज्या ठिकाणी हे टॉवर उभारले गेले आहेत. त्या परिसरात कर्करोग, स्मृतिभ्रंश होणे, सततची डोकेदुखी, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, रोगप्रतिबंधक शक्ती कमी होणे आदी आजार उद्भवत आहेत.
जेवढे अधिक टॉवर तेवढे चांगले नेटवर्क असे समीकरण असते. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल कंपन्या मोक्याच्या जागा शोधून हे टॉवर उभारतात. एकेकाळी शहराच्या बाहेर असणारे हे टॉवर आता भरवस्तीतही उभारले गेले आहे.प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. ग्राहकांची संख्या वाढल्याने त्यांना चांगली सेवा मिळावी या हेतूने अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या. या सोबतच शहरात टॉवरची संख्याही वाढली. इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी इमारतीच्या मालकाला दरमहा १० ते १५ हजार रुपयांपर्यत भाडे मिळते. या रकमेसाठी कोणत्याही स्वरूपाच्या दुष्परिणामांची पर्वा न करता टॉवरसाठी अनुमती दिली जाते. शहरातील मोबाईल टॉवर हे नगरपालिकेतील काही लोकांच्या कमाईचेसुध्दा साधन बनले आहे. पुसद शहरात किती टॉवर्स आहे. त्यांनी परवानगी घेतली किंवा नाही, किती अधिकृत, किती अनधिकृत याचे रेकॉर्डसुध्दा नगर परिषदेकडे नाही.
प्राप्त माहितीनुसार, अनधिकृत टॉवरचीच संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. रहिवाशी भागात झपाट्याने वाढणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींमुळे शहरवासीयांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. टॉवर उभारण्यासाठी राज्य सरकारने काही नियम घालून दिले आहेत. परंतु याही नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरातील अनेक टॉवर नियमबाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरीपणामुळे आजार उद्भवत असल्याचे अनेक शहरांमध्ये उघडकीस आला आहे. मुंबई ईस्टमध्ये ९१ मिटर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना विविध प्रकारचे कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. पक्षी टॉवरच्या परिसरात क्वचित दिसतात. कारण अती दाबांच्या लहरीमध्ये कमी वजनाच्या पक्ष्यांच्या शरीरातील तापमानवाढ होत असल्याचेही उघड झाले आहे.
त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व शहरी भागांमधून नष्ट झाले आहे. गुरगाव दिल्लीमध्ये तर चार टॉवर असललेल्या परिसरामधील फळझाडांना येणाऱ्या फळांचे उत्पादन ९५ टक्यांंने कमी झाले आहे. हे सर्व प्रकार पुढे यत असले तरी भारतीय शास्त्रज्ञांकडून मोबाईल लहरींवर अद्याप एकमत नाही. एम.टेक., बी.टेक. ला असलेले विद्यार्थी या मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या लहरींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करीत आहेत.
गोंदिया शहरात २५ पेक्षा जास्त टॉवरची संख्या आहे. यामध्ये बीएसएनएल, आयडिया, ओडाफोन, एअरटेल, रिलायन्स, युनियॉर, टाटा आदी कंपन्याच्या टॉवरचा समावेश आहे. अनेकांनी नगर पालिकेची परवानगी न घेताच टॉवर उभारलेले असले तरी निकष डावलून टॉवर उभारणाऱ्यांची संख्या जास्त आहे. २०० फूट उंचीच्या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी जमिनीत समांतर जात असल्यातरी त्या सिमेंट कॉक्रिटच्या भिंतींही भेदून आरपार जातात.
तसेच त्या मानवी शरीरालाही भेदून जात असल्याने आजार होण्याची शक्यता असते. सोबतच मोबाईल टॉवर वातानुकूलित ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या जनरेटरमुळे परिसरामध्ये प्रदूषणात वाढ होते.या प्रकाराकडे नगरपरिषदेने लक्ष देण्यची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)