चौकशी अधिकाऱ्यांवरच कारवाईचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:24 IST2018-03-29T21:24:16+5:302018-03-29T21:24:16+5:30
सडक-अर्जुनी नगर पंचायतमधील अनागोंदी कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले होते.

चौकशी अधिकाऱ्यांवरच कारवाईचे निर्देश
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : सडक-अर्जुनी नगर पंचायतमधील अनागोंदी कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच सदस्यी चौकशी समिती गठीत केली होती. मात्र चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल सादर न केल्याने चौकशी समितीतील अधिकाºयांवरच कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बडोले यांनी दिले आहे.
प्राप्त माहितीनुसार पालकमंत्री बडोले यांनी ६ जानेवारीला सडक-अर्जुनी नगर पंचायत येथील गैरप्रकाराची चौकशी करुन ३१ जानेवारीपर्यत चौकशी अहवाल तयार करुन तो जिल्हाधिकाºयांना सादर करण्याचे निर्देश पाच सदस्यीय चौकशी समितीतीला दिले होते. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही चौकशी समितीतील एकाही अधिकाऱ्यांने चौकशी अहवाल सादर केला नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांच्या गृह गावातील ही नगरपंचायत असल्याने व त्यांनी दिलेल्या निर्देशानंतरही चौकशी समितीने अहवाल सादर केला नाही.
त्यामुळे अधिकारी पालक मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचा आरोप तक्रारकर्त्या नगरसेवकांनी केला. तसेच पालकमंत्री बडोले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालकमंत्र्यांचे आदेश अधिकारी पाळत नसतील तर सर्व सामान्य जनतेची कामे खरोखरच करत असतील काय? असा सवाल सुध्दा उपस्थित केला जात होता.
दरम्यान या सर्व गोष्टींची पालकमंत्री बडोले यांनी गांर्भीयाने दखल घेत २५ मार्च ला जिल्हाधिकाºयांना पत्र देवून ३१ जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल सादर न करणाऱ्या चौकशी समितीतील पाचही अधिकाऱ्यांवर कारवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना दिले आहे.विशेष म्हणजे चौकशीसाठी गठीत केलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची ही जिल्ह्यातील कदाचित पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जाते.
दुसरी चौकशी समिती गठीत करा
सडक-अर्जुनी नगर पंचायत कार्यालयात प्रशासकीय काळापासून ते आत्तापर्यंत गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी दुसरी चौकशी समिती गठीत करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून दिले आहेत. आता ही समिती किती दिवसात अहवाल देते याकडे लक्ष लागले आहे.
प्रशासनावर वचक कुणाचा
अलीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याची ओरड वाढली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींची सुध्दा हीच तक्रार असल्याने प्रशासनावर नेमका वचक कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.