निवडणूक निरीक्षकांनी केली कामांची पाहणी
By Admin | Updated: July 16, 2015 01:43 IST2015-07-16T01:43:25+5:302015-07-16T01:43:25+5:30
राज्य निवडणूक आयोगाने १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे.

निवडणूक निरीक्षकांनी केली कामांची पाहणी
ग्रामपंचायत निवडणूक : १८२ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरू
गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहे. त्यांनी जिल्ह्यात विविध भागात निवडणूक कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
चंद्रपूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सुरेश वानखेडे यांची गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व भंडारा येथील विशेष भूसंपादन अधिकारी एच.ए. गवळी यांची गोंदिया, तिरोडा, आमगाव व सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व भंडारा येथील विशेष भुसंपादन अधिकारी एच.ए. गवळी यांची गोंदिया, तिरोडा, आमगाव व सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरीक्षक सुरेश वानखेडे यांनी १३ जुलै रोजी गोरेगाव व सडक अर्जुनी तहसील कार्यालयाला भेट देवून निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननीच्या कामाची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र छाननीच्यावेळी त्यांच्या समवेत गोरेगाव तहसीलदार बांबोडे व सडक अर्जुनी तहसीलदार मोटघरे उपस्थित होते. मतदान अधिकारी यांचेकडून आलेल्या नामनिर्देशनपत्राची माहिती घेतली. आॅनलाईन व आॅफलाईन किती नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले याची सुद्धा माहिती त्यांनी यावेळी घेतली. वानखेडे यांनी उमेदवारांशी सुद्धा चर्चा करून माहिती घेतली.
वानखेडे हे चंद्रपूर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी आहेत. निवडणुकीच्या काळात चिन्ह वाटपाच्या दिवशी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी, प्रचार कालावधीत मतदानाच्या दिवसा अगोदरच्या कोणत्याही एकदिवसाआधी मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी भेट घेणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पारदर्शक आणि मुक्त वातावरणासाठी केल्या सूचना
मतदान केंद्राच्या व्यवस्थेबद्दल, ई.व्ही.एम. वापराबाबत माहिती व्यवस्थीतरितीने व वेळेवर पाठविण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, पोलीस मनुष्यबळ, दारूबंदी करण्यात आली आहे व कसे याबाबतची तपासणी मतदान केंद्रे व त्यावरील उपलब्ध सोयीसुविधा, ई.व्ही.एम.साठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रांग रूम्स व मतमोजणीचे ठिकाण व त्यावरील सर्व व्यवस्था सुद्धा तपासणार आहे. निवडणूक काळात केलेल्या कामाचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे नियमित सादर करणार आहे.