नैसर्गिक शेतीसाठी वीज प्रकल्पाचा पुढाकार
By Admin | Updated: May 25, 2014 23:42 IST2014-05-25T23:42:04+5:302014-05-25T23:42:04+5:30
दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरत जात आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिरोडा येथील अदानी ऊर्जा निर्मिती प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे.

नैसर्गिक शेतीसाठी वीज प्रकल्पाचा पुढाकार
तिरोडा : दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरत जात आहे. तो कायम ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तिरोडा येथील अदानी ऊर्जा निर्मिती प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रकल्पातील कोळशाच्या राखेतून गांढूळ खताची निर्मिती करून ती परिसरातील शेतकर्यांना पुरविली जात आहे. याचा लाभ परिसरातील १८ गावांमधील शेतकर्यांना होणार आहे. या उपक्रमानुसार या परिसरातील शेतकर्यांना गांढूळ खत बनवण्याचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन महिन्याच्या काळात १000 शेतकरी १000 मेट्रिक टन फ्लायअँशने गांढूळ खत निर्मिती करू शकतात, असा अंदाज आहे. शेतकर्यांसह अंदाजे ४00 स्थानिकांना कवलेवाडा, धामणेवाडा, गराडा, चुरडी, काचेवानी, जमुनिया, बरबसपूरा, ठाणेगाव, भिवापूर, चिरेखाणी, चिखली व खामरी या गावातील गांढूळ खत निर्मितीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. फ्लाय अँशचे शेणाच्या रुपात ऑरगॅनिक साहित्यासोबत १:१ या प्रमाणात मिश्रण कर करून ५0 दिवस त्यावर प्रक्रिया केली जाते. गांढूळ, राख व ऑरगॅनिक साहित्याच्या या मिश्रणात फॉस्फेट सोल्युबलायजिंग बॅक्टेरियाचे (पीएसबी) प्रमाण अनेक पटींनी वाढते. यामुळे फ्लायअँशमधील लक्षणीय प्रमाणातील इनसोल्युबल मिनरलचे रुपांतर विरघळणार्या स्वरुपात करण्यास मदत होते आणि त्यामुळे व्हॅर्मिकम्पोस्टमधील पोषण मूल्यांची जैवउपलब्धता वाढते. प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये शेण मुबलक उपलब्ध आहे. त्यामुळे कोळशाची राख आणि गुरांचे शेण यांच्या योग्य व्यवस्थापनातून मोठय़ा प्रमाणात गांढूळ खत निर्मिती करणे शक्य होणार आहे. ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईलच, शिवाय त्यामध्ये समाविष्ट असलेली महत्वाची पोषणद्रव्ये जतन होण्यासाठीही मदत होणार आहे. अदानी पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच आमचे ऊर्जा प्रकल्प पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित वातावरणात चालवणार्या मताचे आहोत. मुंद्रा (गुजरात) येथील गांढूळ खताच्या प्रायोगिक प्रकल्पाच्या यशानंतर आम्ही हा उपक्रम तिरोडा येथे यशस्वीपणे सुरू केला असल्याचे त्यांनी कळविले.(तालुका प्रतिनिधी)