विषमता दूर करणारे साहित्य आवश्यक
By Admin | Updated: June 28, 2015 01:17 IST2015-06-28T01:17:01+5:302015-06-28T01:17:01+5:30
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ....

विषमता दूर करणारे साहित्य आवश्यक
उषाकिरण आत्राम : भाषा संशोधन कार्य सुरू
विजय मानकर सालेकसा
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आजचे साहित्य अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे विषमता दूर करणारे साहित्य निर्मित करणे आजही प्रासंगिक व आवश्यक आहे, असे मत राज्यातील ज्येष्ठ आदिवासी लेखिका व कथाकार उषाकिरण आत्राम (ताराम) यांनी व्यक्त केले. केले.
आंचलिक भाषा संशोधन केंद्र धनेगाव येथे सदर प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार प्रकट केले. लोकमतशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, राज्यात देशात काही उच्चवर्गीय मानल्या जाणाऱ्या तथाकथित लोकांनी आपल्या सोयीनुसार व स्वार्थाला अनुरुप साहित्य निर्मिती केली. त्यामुळे देशात काही मर्यादित लोकांचाच विकास होत गेला व गरीब, गरजू, शोषित, पिडित लोक उपेक्षितच राहिले.
काही मूठभर लोकांनी स्वत:ला श्रेष्ठ बनवून शोषित-पीडितांमध्येसुद्धा तसाच विश्वास प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न केला. सकल समाजाला एका रांगेत उभे करण्यासाठी आज विषमता दूर करण्याचा संदेश देणारे साहित्य निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र या कामात शासनाने सुद्धा योग्य धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची सुद्धा गरज आहे.
समाजामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रभावाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या चांगल्या वाईट गोष्टी दाखविल्या जातात त्यामधून आजची युवा पिढी वाईट कृतीचे जास्त अनुकरण करीत असते. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. माध्यमांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उषाकिरण आत्राम आपल्या लेखणीतून लेख, कथा, कविता इत्यादींची नेहमी निर्मिती करीत असतात.