अकाली पावसामुळे शहर चिखलात
By Admin | Updated: February 12, 2015 01:18 IST2015-02-12T01:18:25+5:302015-02-12T01:18:25+5:30
पहाटे बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरिही दुसरीकडे मात्र शहर चिखलात दिसून आले.

अकाली पावसामुळे शहर चिखलात
गोंदिया : पहाटे बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरिही दुसरीकडे मात्र शहर चिखलात दिसून आले. शहरातील कित्येक रस्त्यांवर पाणी साचल्याचे बुधवारी (दि.११) दिसून आले. पाण्याच्या निकासाची योग्य व्यवस्था नसल्याने पावसाचे रस्त्यावरच अडकून होते व त्याचा फटका मात्र शहरवासीयांना सहन क रावा लागला.
बुधवारी (दि.११) पहाटे पाच वाजतापासून वरूणदेव चांगलेच बरसले. या अवकाळी पावसामुळे पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण बघावयास मिळाले. आनंददायक वातावरण निर्माण झाले असतानाच मात्र दुसरीकडे शहरात पाणीच पाणी दिसून आले. कित्येक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचूनच होते. त्यामुळे नागरिकांना चिखलातूनच आपली वाट काढावी लागत असल्याचे चित्र दिसले. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील रस्त्यांची तशीही दुर्गत झालेली असताना त्या खड्यांत पावसाचे पाणी साचून चिखल झाला होता. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे कपडे चिखलाने माखत असल्याचेही दिसले. तर नेहरू चौकात पाण्याची निकासी होऊ न शकल्याने नेहरूजींच्या पुतळ््या समोरून रस्त्याच्या कडेला चांगलेच पाणी साचले होते. मुख्य मार्ग असल्याने येथे चांगलीच वर्दळ असते व पाणी साचून असले तरिही लोकांच्या अंगावर पाणी उडवत वाहनांनी आपली वाट पकडली.
पाण्याच्या निकासीची योग्य व्यवस्था नसल्याने हा सर्व प्रकार घडत असून पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागला. (शहर प्रतिनिधी)
अंडरग्राऊंड मार्ग पाण्यात
अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले असतानाच अंडरग्राऊंड मार्ग मात्र पाण्या खाली आले होते. पावसाचे पाणी नाल्यांतून या मार्गा लगतच्या सरकारी तलावात जाते. अचानक आलेल्या या पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढली व ओव्हरफ्लो होऊन पाणी थेट रस्त्यावर आले. या रस्त्यावरील हा नेहमीचाच प्र्रकार आहे. पाणी रस्त्यावर आल्यामुळे मात्र येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला.