बाबांच्या उपकाराची परतफेड अशक्य
By Admin | Updated: April 27, 2016 01:49 IST2016-04-27T01:49:32+5:302016-04-27T01:49:32+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित व पीडित समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे काम केले.

बाबांच्या उपकाराची परतफेड अशक्य
पालकमंत्री बडोले : ‘शिल्पकार’ बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाला अफाट गर्दी
गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित व पीडित समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचे काम केले. या महामानवाने केवळ दलितच नव्हे तर शोषित-पीडित बहुजन समाजाला प्रकाशाचा मार्ग दाखिवला. डॉ. आंबेडकरांचे समाजावर अनंत उपकार असून त्यांच्या उपकाराची परतफेड करणे समाजाला शक्य नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
रविवार (दि.२४) रात्री ८ वाजता गोंदिया येथील भीमनगर ग्राऊंडवर सामाजिक न्याय विभागाच्या ‘दूत समतेचा जागर महामानवाचा’ या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पार्श्वगायक प्रा.डॉ. अनिलकुमार खोब्रागडे यांच्या ‘शिल्पकार’ या बुद्ध-भीमगीतांच्या कार्यक्रम झाले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.
उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार हेमंत पटले यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती छाया दसरे, शारदा बडोले, भाऊराव उके, भरत क्षत्रीय, सुनील केलनका, मिनू बडगुजर उपस्थित होते.
बडोले पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यात समाजप्रबोधनाचे कार्यक्र म आयोजित करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर माझ्यासारख्या सर्वसामान्य, गाव खेड्यातला व्यक्ती राज्याचा सामाजिक न्याय मंत्री कदापिही होऊ शकला नसता. हजारो वर्षाचे दु:ख, दारिद्र्य, धर्म, पंथ आणि जातीच्या नावाने माणसाने माणसावर केलेला अन्याय दूर करण्याचे महान कार्य परमपूज्य बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण झाला पाहिजे. धर्म व जातविरहीत समाजाची रचना तयार झाली पाहिजे की, तेथे धर्म व जातीला स्थान राहणार नाही. आर्थिक, सामाजिक व शैक्षणकि समानता निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर राज्य सरकारने खरेदी केले असे सांगून बडोले पुढे म्हणाले, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. ज्या पद्धतीचे स्मारक तिथे उभारावयाचे आहे तशा प्रकारचे स्मारक सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच उभारण्यात येईल. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून समाजबांधवांना खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुप्रसिद्ध पाशर््वगायक प्रा.डॉ. अनिल खोब्रागडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘शिल्पकार’ हा बुद्ध-भीमगीतांचा सुरेल नजराणा या वेळी सादर केला. प्रा.डॉ. अनिल खोब्रागडे यांनी सादर केलेले
‘‘भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना’’
या गीताला उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली. प्रा.डॉ. अनिल वाघमारे व प्राजक्ता मानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशभक्ती आणि इतिहासात त्यांचे अजरामर झालेले नाव व त्यांनी गाजवलेल्या गोलमेज परिषदेवर आपल्या गीतातून प्रकाश टाकला.
‘‘भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकीक केले,
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवूनी ते गेले, गोलमेज ही परिषद त्यांनी वाणीने गाजविली, मुलभूत हक्कांची सगळी कैफियत मांडीयली. ’’
कविवर्य सुरेश भटांनी रचलेले ‘‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे. सुगंधापरी तवकिर्ती दिगंधात वाहे.
भक्तीभाव श्रद्धा सुमने तुला अर्पताना, कंठ दाटूनिये अमुचा सूर्य लोपताना’’
हे गीत पार्श्वगायक प्रा.डॉ. अनिलकुमार खोब्रागडे यांनी सुरेख सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचा अनुभव बालपणीच घेतला.
‘‘शाळेत मला का दूर बसविले जाई, अन्याय मझवरी काहो बाबा होई, नाव्ह्यालाही विटाळ माझा होतो, वस्तरा घेऊन माझ्यावर तो उठतो, या अपमानाने डंक मनावर होई’’
हे गीत प्रा.डॉ. अनिल खोब्रागडे यांनी सादर केले तेव्हा वातावरण भावूक झाले. महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या
‘‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, जखळबंद पायातील साखळदंड, चडा चडा सुटले तू ठोकताच दंड’’.
गुलाम अली यांची
‘‘हम तेरे शहर मे आए है मुसाफिर की तरह, सिर्फ इक बार मुलाकात का मौका दे दे’’
आणि प्राजक्ता मानकर यांनी
‘‘सुभेदाराच्या घरात बाळ जन्मास आला गं, पाळण्यात घालुनी या त्यास झोके देऊ या गं, झोके देऊ या’’
अशी एकापेक्षा एक सुरेल गाणे बाबासाहेबांच्या जीवनावर सादर करु न उपस्थित श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांची दाद घेतली. नगराध्यक्ष व भाजपचे माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन तर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पार्श्वगायक प्रा.डॉ. अनिलकुमार खोब्रागडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. भीमनगर येथील बालसंस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्री बडोले यांच्यावर गीत सादर केले. पालकमंत्री बडोले यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांनी बुद्धविहारात जाऊन गौतमबुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमासाठी प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, समाजकल्याण निरीक्षक अंकेश केदार व समाजकल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)