दोन हेक्टरपर्यंत रेतीचे अवैध उत्खनन
By Admin | Updated: June 16, 2014 23:35 IST2014-06-16T23:35:30+5:302014-06-16T23:35:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी २०१४ रोजी ई-टेंडरिंग पद्धतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातील घाटांचा लिलाव केला. ज्या घाटांचा लिलाव झाला त्या घाटाचे महसूल अधिकाऱ्यांकडून

दोन हेक्टरपर्यंत रेतीचे अवैध उत्खनन
सौंदड : जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारी २०१४ रोजी ई-टेंडरिंग पद्धतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातील घाटांचा लिलाव केला. ज्या घाटांचा लिलाव झाला त्या घाटाचे महसूल अधिकाऱ्यांकडून सीमांकन करुन न दिल्याने लिलाव धारकाने अतिरिक्त भागातील रेतीचा उपसा केला. या विरूद्ध ग्रामपंचायतने व सौंदड वासीयांनी जिल्हाधिकारी व खनिकर्म विभागाकडे तक्रार दाखल करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुक्याच्या हद्दीतून चुलबंद नदीचा प्रवाह आहे. याच चुलबंद नदीच्या पात्रातून कोट्यवधी रुपयांच्या रेतीचा उपसा केला जातो. यावर्षी शासनाकडून घाटांच्या लिलावास विलंब झाला. त्यामुळे लिलावापूर्वीच रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली. या प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायत अंतर्गत सौंदड घाट- २ गट -९८८, जुना आरजी २५ आर. नदीपात्रातील रेतीचा ८८३ ब्रास साठा उपसा करण्याचा लिलाव डी. ठक्कर कंट्रक्शन प्रा.लि. नागपूर यांना ४,५८,५४० रूपयांत करण्यात आला. तसेच सौंदड- १ घाट गट नं. ९८८ आरजी ६० आर नदीपात्रातील २१२० ब्रास रेतीचा उपसा करण्याचा लिलाव पी.आर. लोहिया यांना ४,९७,४२५ रुपयात देण्यात आला. तसेच चुलबंद नदीपात्रातील पिपरी २ घाट-१ जुना आरजी ६० आरमधून २१२० ब्रास वाळूचा उपसा करण्यासाठी डी. ठक्कर कंट्रक्शन कंपनी प्रा.लि. नागपूर या कंपनीला ६,१२,३६३ रुपयात लिलाव देण्यात आला. तसेच पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत गट-३०३ आरजी ६० आर नदीपात्रातील ३१८० ब्रास वाळूचा उपसा करण्याचे कंत्राट जी.आर. लोहिया सौंदड यांना ७,४६,३९० रुपयात देण्यात आला. परंतु या लिलाव धारकांनी निर्धारित सीमांकनाबाहेर जाऊन अतिरिक्त वाळूचा अवैधपणे उपसा करुन शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलाची लूट केली आहे.
सौंदड-१ व सौंदड-२ या रेती घाटावरुन लिलावापेक्षा दोन हेक्टर नदीपात्रातील अतिरिक्त रेतीचा उपसा लिलावधारकाने केला. याच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी संगनमत केल्याने कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
विशेष म्हणजे चुलबंद नदीपात्रातील सौंदड-१ व सौंदड-२ गावांपासून ४ ते ५ किमी अंतरावर आहेत. सौंदड गावातील रस्ता अरुंद असून २ किमी रस्ता गावातून आत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. याच मार्गावर जि.प. प्राथमिक शाळा, जि.प. हायस्कूल व इतर कॉन्व्हेंट आहेत. या मार्गाने रेती वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर भरधाव वेगाने जातात. त्यामुळे रेतीचे कण ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जातात. पळसगाव घाट व पिपरी घाट-२ व सौंदड-२ घाटावरुन सौंदड गावच्या बाहेरील रस्त्याने रेती वाहतूक करण्यासाठी वेगळा मार्ग आहे. परंतु सौंदड-१ घाटावरुन रेती वाहतूक करणारे वाहन सरळ सौंदड येथील पटेल वार्ड, आंबेडकर वार्ड, कृष्ण वार्ड व शास्त्री वार्ड या मार्गाने जातात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकची कोंंडी निर्माण होते. या मार्गावर शाळा महाविद्यालय व घराला लागूनच रस्ता असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक वेळा घाट लिलाव होण्यापूर्वी याच मार्गाने अवैधरित्या रेतीची चोरी करण्यात येते. सौंदड येथील नागरिकांनी सन २०१४-१५ मध्ये या घाटांचा लिलाव न करण्यासंबंधी एक निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांना देण्यात येणार आहे. यात सौंदड-१ रेतीघाटाचा लिलाव न करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सौंदड-२ या घाटावरुन सौंदड व्हाया फुटाळा मार्ग व सौंदड मार्ग असे दोन मार्ग आहेत. या घाटावरील रेती डी. ठक्कर कंट्रक्शन प्रा.लि. नागपूर यांनी इ-लिलाव पद्धतीने घेतलेल्या रेती घाटावरुन एप्रिल महिन्यात ट्रक, टिप्परने रेतीची वाहतूक केली. डी. ठक्कर कंपनीने ट्रक, टिप्परद्वारे सौंदड घाटावरुन रेतीचा उपसा केला. ज्या वेळेस सौंदड घाटावरुन रेतीचे उत्खनन करणे सुरु झाले तेव्हा गट- ९८८ आरजी ६० आरमधून २१२० ब्रास रेती उपसा करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु डी. ठक्कर कंपनीने २ हेक्टर जागेमधून रेतीचे उत्खनन केले.
नागरिकांमध्ये चर्चा आहे की, सौंदड-१ मधील घाट फुटाळा येथील सरपंचाला हाताशी घरुन रस्ता खराब होण्याचे कारण पुढे क रुन डी. ठक्कर कंपनीला वाहतूक करण्यास मनाई केली. तेच ट्रक सौंदड-१ घाटावरुन रेतीचा कसाकाय उपसा केला? यामध्ये कंत्राटदार व फुटाळाचे यांच्यामध्ये डिल झाली असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.
नदीपात्रातील रेतीचा अवैध उपसा केल्याने नदीपात्र ओसाड पडले आहेत. लिलावधारक अवैध वाहतूक व निर्धारित जागेपेक्षा अतिरिक्त जागेतून रेतीचा उपसा करूनही गावकऱ्यांशी मुजोरी करीत आहेत. त्यामुळे ग्रा.पं. ने ठराव पारीत करून लिलावधारकांची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, तहसीलदार पोलीस अधीक्षक व खनिकर्म विभागाकडे करावी, अशी मागणी सौंदड ग्रामवासी करीत आहेत. (वार्ताहर)