अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: May 21, 2016 01:54 IST2016-05-21T01:54:14+5:302016-05-21T01:54:14+5:30
कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही.

अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
शासन व शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेक : कृषी विभागाला भ्रष्टाचाराचे गालबोट
काचेवानी : कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही. आजघडीला सर्वाधिक मालदार कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी दिसून येतात.
कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकरी व शासनाच्या डोळ्यात धूळ टाकून स्वार्थहित कसा साधला, हे सध्या गोरेगाव कृषी तालुक्यांतर्गत चोपा मंडळ कृषी कार्यालयात बोटे येथे कार्यरत आणि २०१५ मध्ये कामे करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर आलेले एन.एस. ईलमे यांच्या दैनिक कार्यावरुन दिसून येते.
माहिती अधिकाराखाली प्राप्त दैनंदिनी कामकाजावरुन कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोरेगाव शेततळी आणि शासनाला चुकीचे कामे दाखवून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. कामाचे दिवस चुकीचे दाखविणे, शेतकऱ्यांसमक्ष कामाच्यापूर्वी व नंतर मोजमाप न करता दाखवणे, गोरेगाव व तिरोड्याचे काम पाहणे, कामे सोडून प्रवास रजा सवलत (एल.टी.सी.) दाखवून शासनाकडून लाभ घेणे, प्रतिनियुक्ती ठिकानातून सतत अनुपस्थित राहणे, चार लाख रुपयांची कामे एकाच दिवशी पूर्ण केल्याचे सांगणे, अशा अनेक बाबी आहेत. त्यावरून कृषी सहायक एन.एस. इलमे यांनी सर्वांशी धोकाधडी करुन फसवणूक केल्याचे दिसून येते.
बसबसपुरा येथे १०७-९४ हे.आर.मध्ये १७ लाख २२ हजार ६४३ रुपयांचे काम दाखविण्यात आले आहेत. माहिती अधिकारात अपूर्ण माहिती मिळाली असली तरी अपूर्ण माहितीकरिता राज्य आयोगाला अपिल करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया यांनी (जी.क्र/उविक्रअ कृसप्रतिनियुक्ती/११३/२०१५ दिनांक २७/१/२०१५) विविध योजनांच्या अल्प प्रगतीचा विचार करता कार्यालयीन व क्षेत्रीय कामे पूर्ण करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी २ मार्च २०१५ ला क्षेत्रीय कामे करण्याकरिता कार्यमुक्त केले. १२ जून २०१५ ला आदेश (क्र.६३३/२०१५) गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी कामाची अडचण पाहता तात्काळ रुजू होण्यास कळविले.
कृषी सहायक नाना ईलमे यांनी स्वत:च्या मर्जीने १२ जून २०१५ ला गोरेगाव कार्यालयात रुजू झाले. तिरोड्यातून मोकळे केल्याचे पत्र मात्र घेण्यात आले नाहीत किंवा दिलेल्या माहितीत पत्र दिसून येत नाही. कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी १ मार्च ते ३० जून २०१५ पर्यंत दिलेल्या कामकाजाची दैनंदिनीमध्ये भ्रामक माहिती दर्शविण्यात आली आहे. या दैनंदिनीवरुन सर्व कामे खोटे दर्शविण्यात आले असून शेतकरी, विभाग आणि शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)