पुलासाठी आणखी किती बळी हवेत?
By Admin | Updated: September 22, 2015 03:02 IST2015-09-22T03:02:17+5:302015-09-22T03:02:17+5:30
तीन दिवसांपूर्वी, म्हणजे १८ सप्टेंबर रोजी दुपारी धानोली-बिंझलीदरम्यान वाहत असलेला कुआढास नाला ओलांडताना

पुलासाठी आणखी किती बळी हवेत?
विजय मानकर ल्ल सालेकसा
तीन दिवसांपूर्वी, म्हणजे १८ सप्टेंबर रोजी दुपारी धानोली-बिंझलीदरम्यान वाहत असलेला कुआढास नाला ओलांडताना अनेकांच्या नजरेसमोर माय-लेकींना जलसमाधी मिळाली. बिंझली येथील ३२ वर्षाची भुमेश्वरी बाबुलाल बिलोने आणि तिची ४ वर्षाची मुलगी जयश्री हे पाण्यात वाहून गेले. जयश्रीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी दिड किमी अंतरावर एका कोपऱ्यात अडकलेला सापडला. सुदैवाने भाग्यश्रीला कसेतरी वाचविण्यात यश आले. मात्र या घटनेने पुन्हा एकदा या नाल्यावर पूल तयार करण्याच्या २० वर्षांपासूनच्या मागणीने उचल खाल्ली आहे.
कुआढास नाल्याच्या पाण्यात कोणी वाहून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकांचा या ठिकाणी बळी गेला आहे. मात्र यावेळी एका महिलेसह तिच्या चिमुकल्या मुलीचा बळी जाण्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हेलावून गेला आहे. प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट येत आहे की, त्या ठिकाणी नाल्यावर पुल असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती. जास्त नाही एक साधा कोल्हापुरी बंधारा बांधला असता तरी लोकांना त्यावरून नियमित पायी येणे-जाणे करणे शक्य झाले असते.
ज्याचा जीव गेला तो परत येणार नाही, परंतु सर्वसामान्य जनतेच्या या मागणीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी सतत कानाडोळा का करतात? निर्दोष भोळ्याभाबड्या व गरीब जनतेला आपल्या जीवाची आहुती देण्यापर्यंत का वाट बघत असतात? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंघावत आहेत. बिंझली-धानोली मार्गावरील कुआढास नाल्यावर पूल तयार करण्यासाठी आणखी किती बळी द्यावे लागणार? असाही उद्वीग्न प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. हाजराफॉल पहाडातून निघणारा कुआढास नाला म्हणायला नाला असला तरी तो एका नदीच्या स्वरुपाचा आहे. येथे जवळपास वर्षभर (उन्हाळ्याचे काही दिवस सोडून) पाणी वाहात असते. पावसाळ्यात या नाल्याचा प्रवाह तीव्र असतो.
एक-दोन दिवस सतत पाऊस आला किंवा अतिवृष्टी झाली तर दुथडी भरुन वाहत असतो. छत्तीसगडच्या क्षेत्रातून वाहून येणारे अनेक छोटे-मोठे नाले हाजराफॉल येथे येऊन मिळतात आणि सर्व पाणी एकत्रित होऊन हाजराफॉलमध्ये खाली पडते. त्यानंतर एका मोठ्या स्वरुपात सालेकसा तालुक्याच्या भूभागात मधोमध वाहात जाऊन बिंझली गावापासून दीड किलोमीटर अंतरावर चिचटोलानजीक वाघनदीला जाऊन मिळते. वाघनदीला पूर आला की या नालाचे पाणी वाढत जाते. अशात या नाल्यावरील सालेकसापर्यंत सर्व छोटे पुल (रपटे) पाण्याखाली बुडतात आणि सर्वत्र मार्गच बंद होतात. या नाल्यावर प्रत्येक ठिकाणी असलेले पुलाची उंची फारच कमी आहे. त्यामुळे हे सर्व पूल पावसाळ्यात बिनकामाचे ठरतात.
बिंझली-पिपरटोलादरम्यान पुलाची गरज का?
४मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर आमगाव सालेकसाच्या मधात धानोली रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर सर्व लोकल गाड्या थांबतात. त्यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणारे लोक धानोलीसह नाल्याच्या बिंझली परिसरातील सुद्धा असतात. बिंझलीपासून धानोली रेल्वे स्टेशनचे अंतर फक्त तीन किमी आहे. आमगाव किंवा सालेकसा १० ते १५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या स्टेशनवरुन प्रवास करणे परवडते.
४दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, धानोली येथे तलाठी कार्यालय असून बिंझली व इतर तीन-चार गावातील लोकांना शेतकऱ्यांना धानोलीला नेहमी जाण्याची गरज पडते. त्यांना नाईलाजाने याच रस्त्यावरुन नाला ओलांडून जावे लागते. त्यामुळे या नाल्यावर पुलाची गरज आहे. या पुलाची मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. पण त्याकडे अजूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोक वाहून गेले आहेत.
लोकप्रतिनिधींच्या नजरेतून उपेक्षित
४तालुक्यात एवढी दुर्देवी घटना घडूनसुद्धा त्या कुटुंबातील लोकांना धाडस देण्यासाठी किंवा थोडीफार मदत देण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी फिरकले नाही. १८ तारखेला दुपारी १ वाजता तीन मायलेकी पुरात वाहून जाण्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात पसरली. महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन सतत तीन दिवस गावात आणि घटनास्थळाला भेट देत राहिले. घटनेच्या दिवशी या क्षेत्राचे आमदार याच तालुक्यात दौऱ्यावर होते. त्यांनी पूर्ण दिवस जनसंपर्कात घालवला, परंतु बिंझली गावाला भेट दिली नाही किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनीही तिथे सांत्वनापर भेट का दिली नाही, असा प्रश्न गावकरी करीत आहेत. या क्षेत्राचे जि.प. सदस्य गोंदिया जि.प.मध्ये समाजकल्याण सभापती आहेत. ते सुद्धा येथे भेट देऊ शकले नाहीत, हे विशेष.
देवदूत बनून धावलेल्या विजयला सन्मानित करा
४घटनेच्यावेळी जवळच आपल्या घरच्या म्हशी, रेडे चारत असलेला युवक विजय श्रीराम ढेकवार याने तत्परता दाखवित नाल्यात उडी मारली आणि पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या छोट्या भाग्यश्रीला सुखरूप बाहेर काढले. यानंतर लगेच तिच्या आईला काढण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. ३०० मीटर दूरपर्यंत वाहत्या पाण्यासोबत संघर्ष करीत त्या महिलेला बाहेर काढले. पण दुर्दैवाने तिने अखेरचा श्वास घेतला होता. दुसरी मुलगी नजरेआड झाल्याने तिलाही वाचविणे त्याला शक्य झाले नाही. विजयसारखे आणखी युवक त्या ठिकाणी असते तर कदाचित तिन्ही मायलेकींना वाचविता आले असते. त्याच्या या बहादुरीबद्दल शासनाने त्याला सन्मानित करावे, अशी मागणी होत आहे.