लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे?
By Admin | Updated: June 14, 2014 23:40 IST2014-06-14T23:40:42+5:302014-06-14T23:40:42+5:30
गोंदिया-भंडारा या आपल्या मतदार संघासाठी काय नाही केले? शेतीच्या सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. देशभरातील कंपन्यांचा सामाजिक दायित्व

लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे?
प्रफुल्लभार्इंचा उद्विग्र सवाल : लोकांवर नाराज नाही, पण त्यांनी आत्मसिंचन करावे
गोंदिया : गोंदिया-भंडारा या आपल्या मतदार संघासाठी काय नाही केले? शेतीच्या सिंचनापासून तर उद्योग, रोजगारवाढीसह प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. देशभरातील कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी या जिल्ह्यांसाठी आणून जिथे ज्या गोष्टीची गरज आहे, त्यासाठी तो दिला. या जिल्ह्यांना राज्यात आणि देशात वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न सुरू होता, पण विकासाच्या या वाटेवर लोकांनी आपली साथ अर्ध्यातच सोडली. मला या निवडणुकीत हारण्याचे फार दु:ख नाही, मात्र एका लोकप्रतिनिधीने नेमके कसे काम करावे म्हणजे लोकांची अपेक्षापूर्ती होईल, हाच प्रश्न आपल्याला पडला आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्याच्या धक्क्यातून सावरल्यानंतर आणि राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर खा.पटेल यांनी शनिवारी पहिल्यांदाच गोंदियात पाऊल ठेवले. आपल्या रामनगर येथील बंगल्यावर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधताना पटेल यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.
आपल्या पराभवासाठी कोणत्याही कार्यकर्त्याला दोष देणार नाही. आपल्या कार्यप्रमाणीतही काही दोष होता असे वाटत नाही. इतकी वर्षे राजकारण करीत असताना या जिल्ह्यातील लोक मला आणि माझ्या कार्यपद्धतीला ओळखत नाही असे होऊ शकत नाही. संपूर्ण देशभरात माझ्यासारखे आपल्या मतदार संघासाठी तळमळीने काम करणारे केवळ ४-५ खासदार होते, हे मी ठामपणे सांगतो. मी कधीही जात, पात, धर्माचे राजकारण केले नाही. पण लोकांनी जर विकासाऐवजी अन्य गोष्टींना महत्व दिले असेल तर त्यात माझा काय दोष? असे पटेल यांनी स्पष्ट केले.
तुमच्या प्रयत्नाने जिल्ह्यात आलेले अनेक प्रकल्प आता पूर्ण होतील का? त्यासाठी तुम्ही मदत करणार का? या प्रश्नावर खा.पटेल म्हणाले, खरे तर आता याची पहिली जबाबदारी नवीन लोकप्रतिनिधीची आहे. आता त्यांचे सरकार आहे. तरीही त्यांना जिल्ह्यातील कोणत्याही विकासात्मक कामांसाठी माझी गरज वाटत असेल आणि ते काम माझ्यामुळे मार्गी लागेल असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी जरूर माझ्याकडे यावे, मी निश्चितच त्यासाठी मदत करील, अशी ग्वाही यावेळी पटेल यांनी दिली.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आपल्या वडिलांनी (मनोहरभाई पटेल) १९४६ पासून राजकारणाला सुरूवात केली. मीसुद्धा गेल्या २४ वर्षांपासून या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना अनेकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. केवळ मंत्रीपद किंवा खासदारकी मिळाल्याने कामे होत नाही. त्यासाठी सर्व स्तरावर असलेले संबंध कामी येतात. आपण या ठिकाणी जे काही करू शकलो त्यासाठी या संबंधांचा योग्य उपयोग केल्यानेच ते शक्य झाले. राजकारणाला आपण व्यवसाय बनविले नाही. वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीवरच आपण खुष असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ.राजेंद्र जैन व राकाँचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)