गोंदिया : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची मागील वर्षाच्यातील गुण तसेच सुरू असलेल्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन याद्वारे गुणांकन करण्यात आले आहे. यामुळे ९९ टक्के निकाल लागला आहे. यामुळे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले आहेत. काहींना अधिक मार्क पडल्यामुळे तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क कसे, असा प्रश्न ते एकमेकांना विचारत आहेत.
......................
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले....
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेतले. वेळ भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला होता. या काळात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते; परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
- राजकुमार हुकरे, पालक करंजी
.............
परीक्षा न घेण्याच्या पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. हुशार विद्यार्थ्यांवर यंदा निकालाचा परिणाम झाला आहे. हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला त्यांना कमी आणि ज्यांनी अभ्यास केला नाही अशांना अधिक मार्क मिळाले आहेत.
- मारोती हत्तीमारे, पालक, नवरगाव.
...................
विद्यार्थी काय म्हणतात....
यंदा बारावीचे वर्ग ऑनलाइनच होते. वेळ भरपूर असल्यामुळे अभ्यासाकडे अधिक लक्ष दिले. परीक्षा होतील असे वाटत असताना परीक्षा रद्द केल्या; परंतु आमच्या अभ्यासाला किंमतच राहिली नाही. अभ्यास केला नाही त्यांनाही आमच्यापेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत.
- आकांक्षा फुंडे, विद्यार्थिनी, करंजी.
....
यंदा बारावीला सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आता खरी अडचण आहे. हुशार विद्यार्थी मागे राहिले. इतरांना चांगले गुण दिल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
- साहिल गडपायले, विद्यार्थी इर्री.
...........
परीक्षा नाही, मूल्यांकन नाही
-सन २०२०-२१ व त्यानंतर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांत गुणांकनाबाबत असमाधान आहे.
- परीक्षा न घेताच गुणदान केले व पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.
..................
मी त्याच्यापेक्षा हुशार आहे. मग त्याला माझ्यापेक्षा गुण अधिक कसे?
-अभ्यास करूनही मला कमी मार्क कमी मिळाले. मात्र, तुला जास्त गुण कसे मिळाले, असा सवाल वर्गमित्र एकमेकांना करीत आहेत.
- बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरत आहे. त्यासाठी विद्यार्थी १२ वीला कसून अभ्यास करतात. त्याशिवाय ज्या अभ्यासक्रमाची ते निवड करणार आहेत, त्याची तयारी सुरू असते.
-यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करण्यात आले आहे. कुणाला कमी तर कुणाला जास्त मार्क मिळाले आहेत, अशा वेळी हुशार विद्यार्थी माझ्यापेक्षा तुला जास्त मार्क कसे मिळाले, असा प्रश्न विचारतात.
.........
एकूण विद्यार्थी संख्या
दहावीचे विद्यार्थी-१९२७४
बारावीचे विद्यार्थी-१८२५८
....
पास झालेले विद्यार्थी
दहावी-१९२६०
बारावी- १८१४४