बालकसरीच्या जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार
By Admin | Updated: November 10, 2015 02:24 IST2015-11-10T02:24:30+5:302015-11-10T02:24:30+5:30
तालुक्यातील बालकसरी येथील जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार करुन त्याच्या मांसाची आपसात वाटून खाण्याची घटना घडली.

बालकसरीच्या जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार
पाच आरोपींना अटक : १९ पर्यंत न्यायालयीन कोठडी
सालेकसा : तालुक्यातील बालकसरी येथील जंगलात रानडुक्कर समजून अस्वलाची शिकार करुन त्याच्या मांसाची आपसात वाटून खाण्याची घटना घडली. सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. अवगान यांनी कारवाई करुन त्या आरोपींना अटक केली. सर्व आरोपींना १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी भंडारा येथील कारागृहात करण्यात आली.
सालेकसा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत बाकलसरी गाव येत असून गावाच्या जवळील जंगलात ३ नोव्हेंबर रोजी रानडुक्कर समजून कोवाचीटोला निवासी महरु हंसराज पंधरे (२२) याने कुऱ्हाडीने प्रहार करुन अस्वलाला मारून टाकले. त्यानंतर बाकलसर्रा निवासी तेजलाल किसन मडावी (४५), रुपचंद सखराम उईके (५०) आणि हिरालाल झिंगू कोराम (४५) यांना याची माहिती दिली. पाच लोकांनी मिळून त्या अस्वलाचे तुकडे करून मांस वाटून घेऊन त्याचा जेवनात उपयोग केला.
याबाबतची माहिती एफडीसीएमच्या एका कर्मचाऱ्याला माहिती मिळाली. त्याने आपल्या सहकाऱ्यासोबत तेजलाल मडावी, रुपचंद उईके आणि हिरालाल कोराम यांना पकडले. रामपाल मडावी आणि महारु पंधरे यांनी पलायन केले. एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांनी या बाबतची माहिती सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. अवगान यांना दिली.
अवगान, सहायक वनसंरक्षक यु.टी. बिसेन, सी.जी. मडावी, आर.एस. भगत, डी.एन. गौर, पी.एस. मेंढे, एफ.सी. शेंडे, आर.जी. जतपेले, एस.एच. रहांगडाले आणि वाय.झेड. शेख यांनी घटनास्थळ गाठून तेजलाल मडावी, रुपचंद मडावी आणि हिरालाल कोराम यांना अटक केली.
४ नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत वनविभागच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले. ६ नोव्हेंबर रोजी रामलाल मडावी आणि महारु पंधरे यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
६ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी देण्यात आली असून त्यांची रवानगी भंडारा येथील कारागृहात करण्यात आली आहे. या भागात रानडुकराची शिकार वाढली असून वनविभागाने अजून दक्ष राहण्याची गरज आहे.