धनत्रयोदशीला खरेदीने गाठला उच्चांक
By Admin | Updated: November 10, 2015 02:26 IST2015-11-10T02:26:59+5:302015-11-10T02:26:59+5:30
दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे सोमवारी (दि.९) बाजारात यंदाची सर्वाधिक गर्दी बघावयास मिळाली.

धनत्रयोदशीला खरेदीने गाठला उच्चांक
इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे कल : सोन्याचे आकर्षण मंदावले
गोंदिया : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे सोमवारी (दि.९) बाजारात यंदाची सर्वाधिक गर्दी बघावयास मिळाली. मात्र आता सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल दिसून आला. सोन्याचा घसरलेला भाव पाहता सोन्यात गुंतवणूक करणे तेवढे फायदेशिर नसल्यामुळे नागरिकांची आवड बदलली असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.
महागाईने कळस गाठला असून यंदा निसर्गाच्या माराने पीकांची नासाडी झाली. परिणामी संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम व्यापारावरही जाणवत असून आर्थिक व्यवहार मंदावून बाजार पडला आहे. अशात सोने २६ हजारांच्या पार गेल्याने व त्यातही एका तोळ्यात दागिना मिळत नसल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा कल आला खालावत चालला आहे. परिणामी सोन्याची झळाळी मंदावली असल्याचे बोलले जात आहे.
दिवाळीत धनोत्रयोदशीच्या दिवशी लहान का नसो मात्र नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे.
आजही या जुन्या परंपरेचे अनुकरण केले जात असून धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वजण एखाद्या वस्तूची हमखास खरेदी करतात. यात धनाढ्यांकडून सोन्याची खरेदी केली जात असल्यास मध्यमवर्गीयाकडूनही भांडे, वाहन किंवा अन्य गरजेच्या वस्तूची खरेदी केली जाते. आजघडीला मात्र मध्यमवर्गीयांचा कल इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडे जास्त दिसून येत आहे. सोन्यातील गुंतवणूक फायद्याची नसल्याचा विचार करून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आज दररोजच्या जीवनात उपयोगी पडतात त्यामुळे हे चित्र असण्याची शक्यता आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी ठरविलेली वस्तू खरेदी करण्यासाठी पूर्वीपासून नियोजन केले जाते व ती वस्त धनत्रयोदशीला खरेदी केली जाते. परिणामी चालत आलेल्या परंपरेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोमवारी (दि.९) बाजारात पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती, एवढी गर्दी होती. (शहर प्रतिनिधी)