गुटखा गेला, खर्रा वाढला, तंबाखू मात्र कायम
By Admin | Updated: May 30, 2014 23:57 IST2014-05-30T23:57:49+5:302014-05-30T23:57:49+5:30
तंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्यांवर कोणताही फरक पडलेला नाही.

गुटखा गेला, खर्रा वाढला, तंबाखू मात्र कायम
बंदी नावाचीच : पानठेले, चालत्या रेल्वेतही सर्रास मिळतो गुटखा, खर्रा
मनोज ताजने - गोंदिया
तंबाखूचे दुष्परिणाम पाहता राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सर्वत्र गुटखा आणि नंतर खर्र्यावर बंदी घातली. पण यामुळे खाण्यार्यांवर कोणताही फरक पडलेला नाही. प्रत्येक पानठेल्यावर आजही बिनधास्तपणे खर्रा विकल्या जातो. फरक एवढाच आहे, आधी जो खर्रा १0 ते १२ रुपयाला मिळत होता तो आता १५ रुपयाला विकत घ्यावा लागतो. दुष्परिणाम कळत असूनही शौकिन मात्र त्यापासून दूर वळत नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.
नागपूर-कोलकाता या मुख्य रेल्वेमार्गावर असलेल्या गोंदियात अनेक गोष्टी रेल्वेतून चोरट्या मार्गाने येतात. त्यात खर्र्यासाठी लागणार्या सुगंधित तंबाखूचाही समावेश आहे. व्यापार नगरी असलेल्या गोंदियात अनेक व्यापार्यांचे देशातील सर्व प्रमुख शहरांमधील व्यापार्यांशी लागेबांधे आहेत. त्यातूनच रेल्वेतून छुप्या मार्गाने गोंदियात दररोज तंबाखू पोहोचतो. हा तंबाखू पानठेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीसुद्धा व्यापार्यांचे नेटवर्क व्यवस्थितपणे काम करते. एवढेच नाही तर बंदी असलेले गुटख्याचे पाऊच आणि पान मसालेसुद्धा गोंदियात उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाने कितीही बंदी घातली असली तरी शौकिनांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. आधी २ रुपयात मिळणारी गुटख्याची पुडी आता ४ ते ५ रुपयाला आणि १0 रुपयात मिळणारा खर्रा आता १५ रुपयात विकला जातो.
राज्य शासनाने घातलेल्या बंदीनंतर गुटख्याचे प्रमाण कमी झाले असले तरी खर्र्याचे प्रमाण वाढले आहे. कोणतेही सरकारी कार्यालय असो, की शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे असो, अध्र्यापेक्षा जास्त कर्मचारी खर्र्याचे शौकिन असल्याचे दिसून येते. दिवसाला १00 रुपये खर्र्यात उडविणारे अनेक महाभाग पहायला मिळतात. स्वत:च्या मुलांसाठी कधी ५ रुपयाचे चॉकलेट न नेणार्यांना स्वत:चा शौक पूर्ण करण्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करताना काहीच वाटत नाही.
आधी घोटलेला तंबाखू ओठात ठेवणार्यांचे प्रमाण बरेच होते. आता अशा प्रकारे तंबाखू खाणे कमीपणाचे दिसत असल्यामुळे चिमूटभर तंबाखूची जागा खर्र्याने घेतली आहे. प्रत्येक कर्मचार्याच्या खिशात खर्र्याची पुडी दिसत असल्यामुळे त्याच्या पिचकार्यांनी अनेक सरकारी कार्यालयांच्या भिंती आणि कोपरे रंगलेले दिसतात.
तंबाखूच्या सेवनाला आळा बसून समाजस्वास्थ्य चांगले राहावे यासाठी सरकारने कायद्याचे बंधन घालून तंबाखूपासून शौकिनांना लांब जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत जनजागृतीची जोड दिली नसल्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना तंबाखूच्या दुष्परिणामांची कल्पनाच नाही. त्यामुळे प्रभावीपणे जनजागृती कार्यक्रम राबवून दुष्परिणामांची कल्पना दिल्यास खर्रा, तंबाकू, गुटख्याला बर्याचा प्रमाणात हद्दपार करण्यास मदत होणार आहे.