पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
By Admin | Updated: June 15, 2016 02:23 IST2016-06-15T02:22:01+5:302016-06-15T02:23:11+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
योजना प्रभावीपणे राबवा : बडोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
गोंदिया : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या वतीने करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवार जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे यांच्यासह सडक-अर्जुनी, गोरेगांव, अर्जुनी मोरगाव व सालेकसा पंचायत समिती सभापती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
बडोले पुढे म्हणाले, केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ ग्रामीण जनतेला व्हावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घ्यावे. सन २०१८ पर्यंत सर्वांना घरकुल देण्याचा मानस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आहे. घरकूल लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने अडचणी दूर करून सुसूत्रता आणावी. घरकूल योजनेचा नियमित आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावे, असे सांगून पालकमंत्री बडोले पूढे म्हणाले, घरकूल योजनांचा मागील काही वर्षाचा जो निधी अद्याप मिळाला नाही त्यासाठी पाठपुरावा करावा. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी समन्वय साधावा. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होईल यासाठी आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विविध लाभार्थ्यांच्या खात्यात आता योजनांचा निधी थेट जमा होतो. त्यामुळे योजनांच्या कामात पारदर्शकता, गतिमानता आली असल्याचे सांगितले. शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. त्याचे निकष ठरले आहे. यामध्ये लाभार्थ्याला स्वत:च्या जवळून पैसा खर्च करूनसुध्दा शौचालय चांगल्या प्रकारे बांधता येणार असल्याचे सांगितले.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अर्जुनी-मोरगाव तालुका आघाडीवर असल्याचे सांगून अर्जुनी मोरगावचे पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी जास्तीत जास्त धान बियाणे उपलब्ध झाले पाहिजे. निमगाव व बोंडगावदेवी येथे अंगणवाडी इमारतीचे काम त्वरित झाले पाहिजे. जेथे अंगणवाड्यांना इमारती नाही तेथे इमारती तातडीने बांधण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तालुक्यातील लाभार्थ्यांचे सन २०१२-१३ मधील घरकूल निधी अभावी काम अर्धवट असल्याचे सांगून सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे यांनी हा निधी मिळाला पाहिजे. तसेच विविध योजनांचा लाभ सालेकसासारख्या नक्षल, आदिवासी व दुर्गम भागातील जनतेला प्राधान्याने मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्य्क्त केली.
योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करून गोरेगांव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी म्हणाले, लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी योग्य सर्वेक्षण झाले पाहिजे. उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कामे झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सभेला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, राजेश बागडे, राजेश देशमुख, अंबादे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता शर्मा, उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, नरेंद भांडारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज गहलोत, लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)