शासकीय कार्यालयांना गांधीजींचा विसर
By Admin | Updated: January 31, 2015 23:23 IST2015-01-31T23:23:23+5:302015-01-31T23:23:23+5:30
राष्ट्रीय थोर व्यक्तिंचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार व रविवारी आल्यास त्यादिवशीच साजरे करावेत

शासकीय कार्यालयांना गांधीजींचा विसर
देवरी : राष्ट्रीय थोर व्यक्तिंचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार व रविवारी आल्यास त्यादिवशीच साजरे करावेत असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्र.प्र. गोसावी यांनी काढले आहे. मात्र शासकीय कार्यालयांत विपरीत स्थिती दिसून येत आहे.
त्याचे असे की, ३० जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी असून सुद्धा शहरातील ग्रामपंचायत सोडून अन्य सर्व कार्यालयांत पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आलाच नसल्याचे दिसून आले. यातून कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांना शासकीय आदेश व गांधीजींचा विसर पडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कृष्णदास चोपकर व सचिव आचले यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन पुण्यतिथी साजरी केली. एकंदर ग्रामपंचायतने शासकीय आदेशाला मान देत राष्ट्रपित्यांना अभिवादन करून मानवंदना दिली.
परंतु शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र शासन आदेशच काय राष्ट्रपित्यांचाही भान राहिला नसल्याचे मुर्त उदाहरण शहरात बघावयास मिळाले. येथील उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, आदिवासी प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो नेहमी प्रमाणे भिंतीवर टांगून होता. कार्यालयात अधिकारी हजर नव्हते. विशेष म्हणजे कार्मचाऱ्यांना विचारणा केली असता महात्मा गांधींची पुण्यतिथी होती याबाबत त्यांनाही माहिती नसल्याचे कळले.
सामान्य प्रशासन विभागाने जयंती व पुण्यतिथी उत्सव साजरे त्याच दिवशी साजरा करण्याचे आदेश काढले आहे. शासनाच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावनी व्हावी यासाठी पत्रकाची प्रत राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालतील विभाग प्रमुखांना पाठविण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर वर्ष २०१५ मध्ये येणाऱ्या राष्ट्रीय पुरुषांचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक या परिपत्रकासोबत दिले असून सदर कार्यक्रम कोणत्या पद्धतीने साजरे करावेत याबाबतच्या सुचनाही त्यात देण्यात आल्या आहेत. चालू वर्षातील सुमारे २५ कार्यक्रमांची यादी या परिपत्रकासोबत आहे.
असे असतानाही अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासकीय आदेश असून सुद्धा शहरातील सरकारी कार्यालयांत महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली नाही ही गंभीर बाब आहे. अशात शासनाच्या आदेशाची पायमल्लीच झाल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)