उच्चाटनासाठी शासन उदासीन
By Admin | Updated: June 18, 2014 00:17 IST2014-06-18T00:17:26+5:302014-06-18T00:17:26+5:30
दरवर्षी १२ जूनला जगभर बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. पण हा दिवस केवळ औपचारिकता ठरत आहे. शासन बालकामगार प्रथेवर आळा बसेल असे कोणतेही ठोस व परिणामकारक पाऊल उचलत नाही

उच्चाटनासाठी शासन उदासीन
सौंदड : दरवर्षी १२ जूनला जगभर बालकामगार विरोधी दिन पाळला जातो. पण हा दिवस केवळ औपचारिकता ठरत आहे. शासन बालकामगार प्रथेवर आळा बसेल असे कोणतेही ठोस व परिणामकारक पाऊल उचलत नाही. शिवाय तशा प्रकारचे कडक नियम करुन या नियमांचे काटेकोर पालनही होताना दिसत नाही.
अनेक बांधकामावर, हॉटेल, पान टपऱ्या, वीटभट्या, तेंदुपत्ता तोडाई अशा एक ना अनेक कामावर बालमजुरांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. याचे प्रमाणही कमी होताना दिसत नाही. या बालकामगारांकडून अधिक काम करुन घेऊन मजुरी मात्र अल्प दिली जाते. ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती दयनिय असते त्या-त्या घरातील लहान मुले पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजास्तव मजुरी करतात. पोटाची आग विझविण्यासाठी नकळत अशा मुलांना मजुरीकडे वळावे लागते.बालकामगार कायदा हा बालमजुरांना पोषक असावा. बालकामगारांना कामावरुन काढून टाकल्यानंतर त्यांच्या घराला आर्थिक आधार मिळेल अशी योजना शासनाने तयार करण्याची गरज आहे. सडक/अर्जुनी तालुका किंवा गोंदिया जिल्हा किंवा संपूर्ण जगभरात बालमजुरी कमी होताना दिसत नाही. आजही हजारो बालकामगार विविध क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांच्यासाठी प्रस्तावित शाळांचाही दुरपर्यंत थांगपत्ता नाही. सडक/अर्जुनी तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरु असलेल्या डोंगरगाव ते कोयलारी रस्त्यावरील पुलाच्या कामावर दल्ली येथील चार अल्पवयीन शाळकरी मुले काम करीत आहेत. यात हितेश कुंभरे, (वर्ग १० वी), अरविंद मडावी (वर्ग ११ वी), विवेक मडावी (वर्ग १० वी) व शुभम उईके (वर्ग १२ वी) यांचा समावेश आहे. हे १५ ते १६ वर्षे वयोगटातील मुले पुलाच्या कामावर काम करतात. यामध्ये हितेश कुंभरे, विवेक मडावी हे दोघे उशीखेडा येथील शाळेत शिक्षण घेतात. तर अरविंद मडावी व शुभम उईके हे दोघे डोंगरगाव सडक येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत. ही चारही मुले मागील १५ दिवसांपासून पुलाच्या कामावर कार्यरत आहेत. या कामावर ही मुले ट्रॅक्टरने सिमेंट आणणे व सिमेंट काँक्रीटचे काम करतात.