गोरेगाव नगर पंचायत झाली टोल फ्री
By Admin | Updated: June 1, 2016 02:23 IST2016-06-01T02:23:12+5:302016-06-01T02:23:12+5:30
राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतमध्ये करण्यात आले. अनेक महिने लोटूनसुद्धा नगर पंचायतीला असुविधेचा सामना करावा लागत आहे.

गोरेगाव नगर पंचायत झाली टोल फ्री
नागरिकांची सुविधा : आशिष बारेवार यांचे प्रयत्न फळाला
गोरेगाव : राज्यातील तालुका स्तरावरील ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतमध्ये करण्यात आले. अनेक महिने लोटूनसुद्धा नगर पंचायतीला असुविधेचा सामना करावा लागत आहे. कुठे निधी नाही, तर कुठे कर्मचारी चाही, अशा स्थितीत नगरवासियांचे समाधान करणे अशक्य आहे. नगर पंचायतच्या स्थापनेपासून आजपर्यंत कामांचे शासकीय नियोजन नाही. नगरवासियांना होत असलेल्या असुविधांचा अभ्यास करून तपासणीअंती नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशीष बारेवार यांनी समस्या, तक्रारी व मार्गदर्शक सूचना नागरिकांकडून मिळाव्यात व त्वरित निराकरण व्हावे यासाठी गोरेगाव नगर पंचायत टोल फ्री क्रमांकाशी जोडून विकासाचा नवा अध्याय गोरेगावात प्रथमच सुरू केला. जिल्ह्यातील टोल फ्री क्रमांकावर सेवा देणारी ही पहिली नगर पंचायत आहे, हे विशेष.
गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत १७ वार्ड असून डिसेंबर २०१५ पासून खऱ्या अर्थाने नगर पंचायतचा कारभार सुरू झाला. नगर पंचायत झाल्यापासून नगरवासियांच्या अपेक्षा गगणाला भिडल्या. पण सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासकीय मान्यतेशिवाय कोणतेही काम करता येत नसल्यामुळे १७ वार्डातील कामे ठप्प पडून आहेत. त्यामुळे नगरवासियांच्या समस्या, तक्रारी वाढतच आहेत. नगर पंचायतचे अध्यक्ष सीमा राहुल कटरे, उपाध्यक्ष आशीष बारेवार, मधुमाला साखरे, राजू टेंभुर्णीकर, निभावती धपाडे, शामली जायस्वाल, रविंद्र चन्ने, हिरवा झंझाड, चंद्ररेखा कांबळे यांनी मासिक सभा घेवून समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. नगरवासियांना सुविधा पुरविणे थांबविता येणार नाही, त्यामुळे प्रत्येक वार्डाची पाहणी करून समस्या व आवश्यक कामाची योजना तयार करून प्रशासकीय मान्यता मिळताच कामाची सुरूवात करायचे ठरविले. कामाला सुरूवात करून नगराचा विकास करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले.
सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने गावातील शुद्ध पाणी पुरवठा, नाली सफाई, स्वच्छता अभियान, रस्ता दुरूस्ती, रस्त्यावर मुरूम टाकणे, गड्डे बुजविणे, पावसाचे पाणी गावाबाहेर जाण्यासाठी पाण्याचा मार्ग मोकळा करणे, शुद्ध पाणी-स्वच्छ परिसर-सक्षम आरोग्य यासाठी सर्वसामान्य फंडातून कामे करून नगरवासियांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस नगर पंचायतचे नगराध्यक्ष सीमा कटरे यांच्यासह उपाध्यक्ष आशीष बारेवार व सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला.
यासाठी नगरवासियांना तक्रार, समसञया, सूचना देण्यासाठी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून नगर पंचायत विनामूल्य टोल फ्री क्रमांक (१८००२३३२५७५) यावर संपर्क साधून माहिती देण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. तक्रार मिळताच समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न नगर पंचायतकडून केला जाईल, असा विश्वास दर्शविण्यात आला आहे.