गोंदिया जिल्हा तहानलेलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST2021-08-13T04:33:22+5:302021-08-13T04:33:22+5:30
अर्जुनी मोरगाव : आगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस ...

गोंदिया जिल्हा तहानलेलाच !
अर्जुनी मोरगाव : आगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी अडकली आहे. धरण, तलाव अद्याप भरले नाहीत. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. उजाडतो तो दिवस तसाच मावळतो, त्यामुळे शेतकरी चिंतातुर दिसून येत आहे.
गोंदिया जिल्ह्याची धानाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. धानपीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. धानपिकाला मुबलक पाण्याची गरज असते. सिंचन सुविधा व पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र, यावर्षी धानपिकाला पोषक अशी पर्जन्यवृष्टी झालीच नाही. बरीचशी रोवणी अद्याप झाली नाही यावरून पावसाची परिस्थिती लक्षात येऊ शकते. ११ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ७५४.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ६२२ मिमी पाऊस झाला आहे. १३२.६ मिमी पावसाची तूट आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांची रोवणी झाली खरी, मात्र पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात इटियाडोह हे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे मोठे धरण आहे. मात्र, त्यात केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने प्रशासन सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याची जोखीम स्वीकारत नाही. यासाठी कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ६ ऑगस्टपर्यंत इटियाडोह धरणातून पाणी सोडण्यात आले होते. ते बंद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवू नये हा या मागील हेतू आहे. ओलिताखाली जी शेतजमीन आहे, ते शेतकरी समाधानी आहेत. मात्र, कोरडवाहू क्षेत्रात असमाधान आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
.............
दोन तालुक्यांत दयनीय अवस्था
आमगाव व सडक अर्जुनी तालुक्याची अवस्था दयनीय आहे. या तालुक्यांत तर सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टीचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते. अद्यापतरी हे भाकीत खरे होताना दिसून येत नाही. त्यामुळे यावर्षी पर्जन्यवृष्टी सरासरी गाठेल किंवा नाही याबद्दल शंकाच आहे. धान शेतीला वेळोवेळी पाण्याची गरज असते. अवेळी पाऊस आलेले चालत नाही. यंदा मात्र अजिबात तसे चित्र दिसून येत नाही. मागील वर्षी २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस झाला होता. आणखी मान्सून सक्रिय होण्याचे संकेत प्रसारमाध्यमातून व्यक्त होत आहेत.
........
अखंडित वीजपुरवठा द्या
धानपीक हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची अवकृपा झाली आहे. पाण्याची सुविधा आहे त्यांची रोवणी झाली. कोरडवाहू क्षेत्रात अद्याप रोवणी झाली नाही. कुणी पाणी विकत घेऊन रोवणी केली; पण त्यानंतर पावसाने डोळे वटारले. वीज पुरवठा केवळ आठ तास होतो. ज्यांच्याकडे पाणी व पंप आहेत ते कसेबसे सावरतील; पण ज्यांनी पंप भाड्याने घेऊन रोवणी केली त्यांची मोठी अडचण आहे. विजेचा आठ तास पुरवठा पुरेसा नाही. ज्यांच्याकडे ही सुविधा आहे तो शेतकरी विजेच्या वेळात स्वतःच्या शेतीला पाणी पुरवठा करेल की भाड्याने मागणाऱ्याला देईल, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी पीक निघेपर्यंत अखंडित वीजपुरवठा करावा.
- गंगाधर परशुरामकर, प्रगतशील शेतकरी खोडशिवणी