बाजार समितीत ‘फ्री सेल’ नावापुरतीच
By Admin | Updated: January 5, 2015 23:05 IST2015-01-05T23:05:25+5:302015-01-05T23:05:25+5:30
शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली.

बाजार समितीत ‘फ्री सेल’ नावापुरतीच
कपिल केकत - गोंदिया
शेतकऱ्यांना थेट व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करता यावा व अडत्यांना (दलालांना) द्यावे लागत असलेल्या अडतपासून (दलाली) सुटका व्हावी या उद्देशातून कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘फ्री सेल’ सुरू करण्यात आली. मात्र मागील कित्येक वर्षांपासून या फ्री सेलमधून शेतकऱ्यांनी व्यवहारच केला नसल्याची माहिती आहे. अडते शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून देत असून रोख पेमेंट करीत असल्याने शेतकऱ्यांचीच फ्री सेलमधून व्यवहार करण्याबाबत अनिच्छा असल्याचे बाजार समितीत बोलले जाते.
बाजार समितीत होत असलेल्या व्यवहारांत अडते (दलाल) महत्वाची भुमिका बजावतात. या मोबदल्यात मात्र शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी अडते मदत करतात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना अडत्यांना व्यवहार करण्यात रकमेच्या काही टक्के अडत द्यावी लागते. येथील बाजार समितीत ही अडत तीन टक्के घेतली जाते.
शेतकऱ्यांना ही अडत द्यावी लागू नये व त्यांची ही रक्कम वाचावी या उद्देशातून ‘फ्री सेल’ बाजार समितीत सुरू करण्यात आली आहे. सन १९६० पासून व्यवहारात असलेल्या येथील बाजार समितीत ही पद्धती सुरू आहे. येथे आश्चर्याची बाब मात्र अशी की, या ‘फ्री सेल’ मधून मागील कित्येक वर्षांपासून एकही व्यवहार शेतकऱ्यांनी केलेला नाही. परिणामी बाजार समितीत ‘फ्री सेल’ ही व्यवहाराची पद्धत नाममात्र ठरत आहे. तसेच ‘फ्री सेल’ साठी बाजार समितीत क्रमांक १ चे शेड राखीव ठेवण्यात आले होते. मात्र ‘फ्री सेल’ मधून व्यवहारच होत नसल्याने बाजार समिती जागा कमी पडत असल्याने आता त्या शेड मधून दररोजचे व्यवहार करीत आहे.
‘फ्री सेल’ अंतर्गत व्यवहार करण्याची पद्धत
या व्यवहार पद्धतींतर्गत अडते राहत नाही. शेतकरी थेट बाजार समितीत कार्यरत व्यापाऱ्यांसोबत मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. यासाठी शेतकऱ्याला प्रथम बाजार समितीकडे नोंद करावी लागते. यावर बाजार समिती शेतकऱ्याला बाजार समितीचा एक कर्मचारी देतो व शेतकऱ्याचा माल फ्री सेल साठी असलेल्या शेड मध्ये ठेवला जातो. यासाठी मात्र संबंधीत शेतकऱ्याला त्याच्या मालाची सफाई करणे, पोत्यात भरणे, शेड मध्ये माल साचून ठेवणे आदी कामांसाठी हमालांना मजूरी द्यावी लागते. त्यानंतर बाजार समितीचा कर्मचारी मालाचा लिलाव करीत असून बोली लावून घेण्यास मदत करतो.