उड्डाणपुलावर रुंदी कठडे लावण्याचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:22 IST2018-09-26T00:21:05+5:302018-09-26T00:22:18+5:30
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर या पुलावरील जडवाहतूक बंद करण्यासाठी दोन्ही बाजुला उंची कठडे लावण्यात आले.

उड्डाणपुलावर रुंदी कठडे लावण्याचा विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर या पुलावरील जडवाहतूक बंद करण्यासाठी दोन्ही बाजुला उंची कठडे लावण्यात आले. मात्र उंची कठड्यासह रुंदी कठडे सुद्धा लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने या पुलावरुन धोका पत्थकारुन जड वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. पुलाच्या मध्यभागी मोठे खड्डे पडले असून पुलाचा भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे विभागाच्या तज्ञांच्या चमूने पुलाचे निरीक्षण केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे सांगत या पुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मात्र जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहनाची कोंडी आणि दोन्ही बाजुच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या पुलावरुन जडवाहने वगळता हलक्या वाहनाना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
रेल्वे विभाग आणि जिल्हा प्रशासनावर यासाठी दबाब वाढल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आला. तसेच या पुलावरुन जडवाहने जाऊ नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला उंची कठडे लावण्यात आले. उंची कठडे लावताना रुंदी कठडे लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.
मात्र मागील दोन महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजुला रुंदी कठडे लावले नाही. परिणामी जुन्या उड्डाणपुलावरुन मोठी जडवाहने वगळता इतर वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे.
त्यामुळे पुलावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
केवळ दुचाकी व आॅटोला परवानगी
शहरातील जुन्या उड्डाणपुलावरुन केवळ आॅटो आणि दुचाकी वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस पुलाच्या दोन्ही बाजुला कर्तव्य बजावित असून त्यांच्या डोळ्यादेखत आॅटो व दुचाकी वगळता इतरही वाहने धावत आहे. मात्र कारवाई करण्याचे टाळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्ट्रक्चरल आॅडिटचा विसर
जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेत रेल्वे विभाग आणि सार्वजनिक विभागातंर्गत या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी घेण्यात आला. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी स्ट्रक्चरल आॅडिटचा विसर या दोन्ही विभागाला विसर पडल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
जुन्या जीर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गांर्भियाने घेत यावर त्वरीत उपाय योजना करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाना दिले होते. मात्र अद्यापही त्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. केवळ या विषयावर बैठका घेवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.