नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरू

By Admin | Updated: August 25, 2015 02:28 IST2015-08-25T02:28:02+5:302015-08-25T02:28:02+5:30

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले होते. नुकसान भरपाई

Five crore allotment of compensation | नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरू

नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरू

काचेवानी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठेच नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने तिरोडा तालुक्यासाठी ४ कोटी ९५ लाख रूपये मंजूर केले आहे. नुकसान ग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी महसूल विभागाला दिले आहेत.
फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात तिरोडा तालुक्यातील शेतकरी सापडले होते. जिरायती व बागायती पिकांचे मोठेच नुकसान झाले होते. तालुक्यातील १२५ गावांना याचा फटका बसला होतो. तर १२ हजार २९९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. जिरायती शेतातील गहू, हरभरा, जवस व इतर तसेच बागायती पिकांमध्ये भाजीपाला आदी पिके संपूर्ण नष्ट झाली होती.
भरपाई त्वरित मिळण्यासाठी शेतकरी सतत पाठपुरावा करीत होते. याची दखल तिरोडा-गोरेगाव क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी घेऊन राज्य शासनाकडून तिरोडा तालुक्यासाठी चार कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर करून आणला.
अवकाळी पाऊस व गारपीट यात ज्यांच्या शेतातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी १० हजार रूपये (एकरी चार हजार रूपये) दिले जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व त्यांना देय असणारी रकमेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीला यादी मिळाली नसेल त्यांनी त्वरित न्यावे, असे आ. विजय रहांगडाले यांनी सांगितले.
सर्वाधिक नुकसानग्रस्त भागात अर्जुनी क्षेत्राचा समावेश आहे. तसेच नुकसानग्रस्त गावांमध्ये घाटकुरोडा १९४ हेक्टर (१९.४० लाख), सोनेगाव १४७.२७ हेक्टर (१४.७२ लाख), चांदोरी (बु.) १२० हेक्टर (१२ लाख), कवलेवाडा ११४ हेक्टर (११.४० लाख), मेंढा १११ हेक्टर (११.१० लाख), परसवाडा ९० हेक्टर (नऊ लाख), गोंडमोहाळी ८१ हेक्टर (८.१० लाख), भजेपार ६१ हेक्टर (६.१० लाख) व सुकडी-डाकराम ६३.३६ हेक्टर (६.३४ लाख) एवढे रूपये मिळणार आहेत. सर्वात कमी नुकसान दर्शविण्यात आले, त्यात चोरखमारा ०.२० हेक्टर, भुराटोला १.२० हेक्टर, पुजारीटोला एक हेक्टर व भोंभोडी येथे २० हेक्टरचा समावेश आहे. भोंभोडी येथे नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २०० आहे. (वार्ताहर)

शेतकऱ्यांनी बंँक खाते तपासावे
४शेतकऱ्यांनी उसनवारीने पैसे घेऊन कर्जबाजारी होऊन शेतीची कामे पूर्ण केली. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भरपाई रक्कम देण्यास कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्याला वेठीस धरण्यात येईल. ५० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून आठ दिवसात पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते तपासावे, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले आहे.

मी शेतकऱ्याचा मुलगा असून मला शेती व शेतकऱ्याचा अनुभव आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकरी विशेषकरून तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील शेतकरी दीन-दुबळ्याचे जीवन जगत आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही दु:ख, समस्या व अडचणी सरकार दरबारी ठेवून त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार.’’
-आ. विजय रहांगडाले,
विधानसभा क्षेत्र, तिरोडा-गोरेगाव.

Web Title: Five crore allotment of compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.