धान उत्पादकांचे आर्थिक शोषण
By Admin | Updated: May 9, 2014 03:15 IST2014-05-09T03:15:36+5:302014-05-09T03:15:36+5:30
तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने

धान उत्पादकांचे आर्थिक शोषण
खरेदी केंद्र नाही : बाजार समितीत कमी दरात खरेदी
तिरोडा : तालुक्यात तलावाच्या पाण्याने रबी (धान) पिकविल्या जात आहे. खरीप हंगामात वेळोवेळी पाऊस आल्याने धानावर किडींचा प्रादुर्भाव व विविध रोगांची लागण झाल्याने शेतकर्यांना धानाचे उत्पादन फारच कमी झाले. परंतु तलावात पाणी भरपूर वाचल्याने रबीची लागवड जास्त झाली. परंतू आता खरेदी केंद्रच सुरु करण्यात आले नसल्याने व कृ.उ.बा.स. मध्ये आधारभूत किमतीपेक्षा (१३१0) कमी किमतीत धान खरेदी केल्या जात असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी गोंदिया यांनी तत्काळ लक्ष घालून शक्य तितक्या लवकर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकर्यांच्यावतीने केली जात आहे.
तालुक्यात चोरखमारा, बोदलकसा, खळबंदा, धापेवाडा उपसा जलसिंचन व मोटारपंपाद्वारे शेतीला सिंचित करण्यात येत आहे. रबी हंगामातील धान निघायला सुरुवात झाली आहे. परंतु धान खरेदी केंद्र सुरु झालेली नाही.
आधीच कधी अतवृष्टी, कधी गारपीट तर कधी किडींचा प्रादुर्भाव अशा विविध संकटांनी ग्रस्त शेतकरी आता कुणाकडून घेतलेले उसणवारीचे पैसे परत करावे लागणार या चिंचेत आहे. इकडे धानाला भाव न मिळाल्याने अधिक चिंतीत झालेला आहे. दुसरीकडे व्यापारी-दलाल- कृ.उ.बा.स.चे संचालक व समितीचे अधिकारी, पदाधिकारी हे मात्र आपसात साटे-लोटे करुन शेतकर्यांचे शोषण करण्यात मग्न असल्याचे बोलले जाते. शासन याबाबात थातूर-माथूर कार्यवाही करुन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे.
तालुक्यात अजुनपर्यंत एकही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव खाजगी व्यापार्याला कमी किमतीत धानाची विक्री शेतकर्यांला करावी लागत आहे. तालुक्यात वडेगाव, भजेपार, मारेगाव, सातोना, लाखेगाव, विहिरगाव, विर्सी, ठानेगाव, गराडा, मेंढा, सुकडी, परसवाडा, अर्जुनी, इंदोरा, चिरेखानी, तिरोडा, गुमाधावडा अशा विविध गावातील शेतकरी रबी पिकांची लागवड जास्त प्रमाणात करतात. (शहर प्रतिनिधी)