अखेर ‘त्यांना’ पाठविली नोटीस
By Admin | Updated: August 31, 2015 01:40 IST2015-08-31T01:40:31+5:302015-08-31T01:40:31+5:30
मारहाण करण्यात येत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्याच्या तब्बल सहा दिवसांनंतर बुधवारी (दि.२६) पालिका प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापक ...

अखेर ‘त्यांना’ पाठविली नोटीस
विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण : लोकमतच्या पाठपुराव्याचा परिणाम
गोंदिया : मारहाण करण्यात येत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्याच्या तब्बल सहा दिवसांनंतर बुधवारी (दि.२६) पालिका प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाला कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आले. साधे नोटीस देण्यासाठी सहा दिवसांचा अवधी लागत असल्याने पालिका प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन किती तत्पर आहे, हे या प्रकारातून दिसून येते.
शहरातील गोविंदपूर परिसरात असलेल्या नगर परिषद शाळेतील पर्यवेक्षक अनुराग तिवारी हे विद्यार्थ्यांना काडीने मारतात. विद्यार्थ्यांना शिकविणे सोडून आपल्या घरच्या गोष्टी सांगतात. तसेच विद्यार्थ्यांचे मायबाप काढून त्यांना टीसी देण्याची व सर्व नगरसेवक ओळखीचे असून कुणीही काही करू शकत नसल्याची धमकावणी देतात. पोषण आहारात अळ््या निघतात. शिवाय बेंच तुटलेले, पंखे नादुरूस्त, शौचालय वापरण्यासारखे नाही, विषयांचे शिक्षक नाहीत असे असतानाही कुणालाही काही सांगायचे नाही असे ते विद्यार्थ्यांना धमकावितात.
या प्रकाराची वाच्यता खुद्द शाळेतील २५-३० विद्यार्थ्यांनी २१ आॅगस्ट रोजी पालिका कार्यालयात धडक देऊन प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्याकडे केली होती. यावर राणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक विजय शर्मा व पर्यवेक्षक तिवारी यांना नोटीस देणार असल्याचे सांगीतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी लगेच मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाला नोटीस देणे गरजेचे होते.
मात्र पालिका प्रशासनाला हे नोटीस देण्यासाठी तब्बल सहा दिवसांचा अवधी लागला. त्यांनी बुधवारी (दि.२६) मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाला नोटीस दिले. यातून पालिका प्रशासन विद्यार्थ्यांना घेऊन किती तत्पर आहे हे दिसून येते. तर या प्रकरणात आता कारवाई केली जाते की कारवाईच्या नावावर फक्त थातूरमातूर खेळ खेलला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)