कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: March 23, 2015 01:40 IST2015-03-23T01:40:34+5:302015-03-23T01:40:34+5:30
परीक्षेदरम्यान चालणाऱ्या कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभाग कॉपी मुक्त अभियान राबवित आहे.

कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात
काचेवानी : परीक्षेदरम्यान चालणाऱ्या कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभाग कॉपी मुक्त अभियान राबवित आहे. या अंतर्गत परीक्षा केंद्रांवर लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्त तसेच कॉपी न करता परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी व पालकांत निर्माण झालेली जागृती यामुळेच कॉपीमुक्त वातावरणात बारावीची परीक्षा संपली. आता दहावीची परीक्षा अंतिमटप्यात आली आहे.
परीक्षा म्हटली की विद्यार्थीच काय तर त्यांचे पालकही तणावात असतात. यातूनच कॉपीचे प्रकार घडतात. विद्यार्थी कॉपी तर करतात, मात्र कित्येक पालकही या कामात त्यांची साथ देतात. आपल्या पाल्याला कॉपी मिळावी यासाठी कित्येक पालक परीक्षा केंद्रावर सेटींग करीत किंवा बाहेरून कॉपी पोचविण्यासाठी केंद्राबाहेर बसून राहतात. विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालक , नातलग किंवा मित्रमंडळीत अधिक उत्साह दिसून येत होता. परिणामी परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्यासाठी एकच गर्दी दिसून येत होती.
मात्र दोन दशकापूर्वीचे हे चित्र आता पालटले आहे. स्पर्धात्मक दृष्टिकोन, परीक्षेविषयक शासनाचे दिवसेंदिवस कडक धोरण, सुलभ शिक्षण प्रणाली, शासनाद्वारे पाठ्यक्रम पुस्तकांचा पुरवठा, विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आणि शिक्षकांसह परीक्षेशी संबंधित संचालन मंडळावर लादलेल्या जबाबदाऱ्या, शिवाय परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात येत असलेला पोलिसांचा चोख बंदोबस्त, अशी अनेक कारणे कॉपी मुक्त परीक्षा अभियानाच्या यशस्वितेसाठी पोषक ठरत आहेत.
शिक्षण विभागाने परीक्षा सोप्या व सुलभ करण्याकरिता प्रात्यक्षिकांवर २० गुण दिले. प्रश्नपत्रिकेत सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला. विद्यार्थ्यांना आपण उत्तीर्ण होणारच अशी भावना निर्माण झाली असून त्यातूनच अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. तर दहावी आणि बारावी परीक्षेत कॉपी करण्यात आली तर त्यापुढील अभ्यासक्रमात यश संपादन करता येणार नाही. अर्थात दहावी आणि बारावी परीक्षेत कॉपी करून भरपूर टक्केवारी मिळविली, त्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी समजूत विद्यार्थी व पालकांत येवू लागली. त्यामुळेच पालक पाल्यांना मेहनत करून मिळेल तेवढी टक्केवारी पटकाविण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
याच कारणामुळे आजघडीला कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे दिसून येते. बारावीच्या परीक्षा नुकत्यात संपल्या. मात्र या परीक्षेदरम्यानही परीक्षा केंद्राबाहेर पूर्वी राहत होती तशी गर्दी दिसून आली नाही. तर दहावीच्या परीक्षाही सुरळीतपणे सुरू आहे.
काही प्रमाणात कॉपीचे प्रकार चालतात. त्यावर बाहेरून पोलिसांची लाठी तर आतमध्ये भरारी पथकाची कारवाई आळा घालतेच. मात्र परीक्षा केंद्राची पाहणी केल्यावर शांत व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)