पाचव्या दिवशीही कवलेवाड्यात तणावपूर्ण शांतता कायम
By Admin | Updated: May 22, 2014 01:12 IST2014-05-22T01:12:56+5:302014-05-22T01:12:56+5:30
तालुक्यातील कवलेवाडा येथील एका दलित व्यक्तीवर रॉकेल टाकून पेटविण्याच्या प्रकरणाचे पडसाद

पाचव्या दिवशीही कवलेवाड्यात तणावपूर्ण शांतता कायम
गोरेगाव : तालुक्यातील कवलेवाडा येथील एका दलित व्यक्तीवर रॉकेल टाकून पेटविण्याच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही गावात कायम आहे. बुधवारी पाचव्या दिवशीही गावात तनावपूर्ण शांतता होती. सर्वत्र खळबळ उडवून देणार्या संजय खोब्रागडे जळीत प्रकरणामुळे कवलेवाडा गाव प्रकाशझोतात आले. कधीकाळी साधे नावही माहित नसलेल्या कवलेवाडा गावात मंत्र्यांपासून तर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांच्या भेटी होत आहेत. यात खोब्रागडे यांच्या मृत्यूपूर्व बयानात त्यांनी ज्यांची नावे घेतली तेच आरोपी आहेत हे गावकर्यांना पचनी पडत नव्हते. पोलिसांनी वास्तविकता जाणून घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगळ्या दिशेने फिरविल्यावर या प्रकरणात धक्कादायक बाबी पुढे आल्या. सदर प्रकार दलितावरील अत्याचाराचे नसून जखमी इसमाची पत्नी आणि तिच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचे सोमवारी सायंकाळी पोलिसांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाकडे कवलेवाडा येथे भयभीत वातावरण आहे. गावात गेल्या पाच दिवसांपासून पोलीसांचा बंदोबस्त आहे. साध्या वेशभुषेत पोलीस गावात, पानटपर्यावर बसून गावातील तनावपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. घटनास्थळाच्या जवळ पोलीस छावणी असून चोख बंदोबस्त आहे. या जळीत प्रकरणामुळे गावकर्यांच्या विविध चर्चा सुरू आहेत. पानटपर्यावर बसून गावकरी घडलेल्या प्रकरणाविषयी संताप व्यक्त करताना दिसतात. पण त्याहीपेक्षा ‘त्या’ सहा लोकांना उगीचच फसविले हा मोठा संताप गावकर्यांच्या चेहर्यावर त्यांच्या बोलणावरुन प्रकर्षाने जाणवतो. दुसरीकडे पत्नी आणि प्रियकराने संजय खोब्रागडेला कसे काय जाळले असेल? ‘इसके पिछे कोई मास्टरमाईंड होगा’ मध्येच कुणीतरी असे हिंदीत आपल्या शंकेला वाट करून देतो, पुन्हा तर्कवितर्क सुरू होतात. तासनतास चालणार्या या गावकर्यांच्या चर्चा संपता-संपत नाही. (तालुका प्रतिनिधी)