पटोलेंच्या आश्वासनानंतर सोडले उपोषण
By Admin | Updated: December 6, 2015 01:47 IST2015-12-06T01:47:12+5:302015-12-06T01:47:12+5:30
महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.

पटोलेंच्या आश्वासनानंतर सोडले उपोषण
नऊ वनमजूर होते उपोषणावर : ३२ रोजंदारी मजुरांवर आर्थिक संकट
गोंदिया : महाराष्ट्र राज्य वनकर्मचारी व वनमजूर संघटनेच्या वतीने नवेगाव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान (पार्क) येथील वनमजुरांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. खा. नाना पटोले यांच्या पुढाकाराने वनमजुरांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष संपत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ९ वनमजूर नवेगाव अभयारण्यातील वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले होते.
नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्य व उद्यानात सन २००० पासून ३२ रोजंदारी वनमजूर काम करीत आहेत. १२ वर्ष सेवा दिल्यावर २०१३ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आल्यावर या वनमजुरांना काम मिळानासे झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. गेल्या तीन वर्षात वनविभागाने त्यांच्या रोजगाराचा विचार केला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची पाळी आली होती.
संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सदर वनमजुरांना पूर्ववत काम करण्याची मागणी करीत होते. तसेच अधिकारांशी चर्चा करून वनमजुरांना कोटेशन पद्धतीने कामावर घेण्याची मागणी केली. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. वारंवार मागणी करूनही अधिकारी वनमजुरांच्या प्रश्न व समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने व आपल्याला पूर्ववत कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी वनविभाग कार्यालयासमोर ३२ रोजंदारी वनमजुर आमरण उपोषणावर बसणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी वनमजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने ९ मजूर वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर उपोषणाला बसले.
खा. नाना पटोले यांनी संबधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून वनमजुरांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करून वनमजुरांच्या सर्व मागण्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. सोबतच वनकर्मचारी व वनमजुरांच्या संघटनेची बैठक हिवाळी अधिवेशनात घडवून आणून इतर समस्यांही सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खा. पटोलेंच्या आश्वासनानंतर संघटनेचे अध्यक्ष व वनमजुरांनी आपले उपोषण मागे घेतले. खा. पटोले यांनी उपोषणावर असलेल्या वनमजुरांना निंबू पाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी प्रामुख्याने वनविभागाचे विभागीय वनाधिकारी कातोरे, उपविभागीय वनअधिकारी गुप्ता, वनपरिक्षेत्राधिकारी दोनोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)