दुष्काळासाठी उपोषण
By Admin | Updated: December 16, 2014 22:55 IST2014-12-16T22:55:51+5:302014-12-16T22:55:51+5:30
तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमिन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशातच यंदा अपुरा पाऊस यामुळे अनेक गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असताना महसूल विभागामार्फत चुकीची

दुष्काळासाठी उपोषण
शेतकरी संकटात : लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
लाखांदूर : तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमिन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशातच यंदा अपुरा पाऊस यामुळे अनेक गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असताना महसूल विभागामार्फत चुकीची आणेवारी शासनाला सादर करून अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी व तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणीला घेवून माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे.
तालुक्यातील अनेक गावातील शेतजमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील पाच वर्षापासून पावसाचा खेळखंडोबा शेतकऱ्यांची फसगत करीत आहे. यंदाही तालुक्यातील कोच्छी, धर्मापुरी, बोथली, पाऊदवना, घोडेझरी, मासळ, बेलाटी, तिरखुरी, पेंढरी, सोनेगाव, पाचगाव, हरदोली, तई (खु.), तई (बु.), खोलमारा, बारव्हा, जैतपूर, कोदामेडी, चिकना, चिचाळ, मुर्झा, दहेगाव, मुरमाडी, पारडी, झरी, मालदा, तावशी, साखरा, दिघोरी अन्य इतर गावातील शेतकऱ्यांना धानपीक अपुऱ्या पावसामुळे घेता आले नाही. अनेकांनी रोवणी सुद्धा केली नाही. तरीपण महसूल विभागाने शासनाला तालुक्यातील आणेवारी ६५ पैसे दर्शविली. ही आणेवारी प्रत्यक्षात घेतली नसून कागदोपत्री तयार केली असल्याचे आरोप करीत उपोषणकर्त्यांनी न्यायासाठी तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषणाला दि. १६ डिसेंबर पासून सुरुवात केली. पारडी येथे मंडळ अधिकारी, तलाठी व गावातील जबाबदार नागरिकांच्या समक्ष पिक पाहणी करून पंचनामे केले असता पैशाची आणेवारीत विसंगती आढळून आली. त्यामुळे आणेवारीवर आक्षेप घेत वस्तूनिष्ठ आणेवारी दर्शवून लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी उपोषणाच्या माध्यमातून रेटून धरली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये चंद्रशेखर टेंभुर्णे यांचा समावेश असून पहिल्या दिवशी बालू चुन्ने, शंकर खराबे, संतोष गोंधळे, मानबिंदू दहिवले, प्राणेश्वर कावळे आदींनी भेट दिली.