सिंचन योजनेमुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: June 15, 2014 23:37 IST2014-06-15T23:37:31+5:302014-06-15T23:37:31+5:30
गोंदिया तालुका अंतर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला सिंचनाची व्यवस्था होऊन या भागात हरितक्रांती येणार असे दिवास्वप्न येथील पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाखविले होते.

सिंचन योजनेमुळे शेतकरी त्रस्त
रावणवाडी : गोंदिया तालुका अंतर्गत येणाऱ्या रावणवाडी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला सिंचनाची व्यवस्था होऊन या भागात हरितक्रांती येणार असे दिवास्वप्न येथील पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाखविले होते. परंतु शेतकऱ्यानच्या आशेवर पाणी फेरल्या गेले.
रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचा कलवा तयार करताना मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. मात्र यातून निघणाऱ्या माती मलबा दगड नजीकच्या शेतात अस्ताव्यस्त स्थितीत पसरविण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग शासन यंत्रणेबद्दल असंतोष व्यक्त करीत आहे.
काही अल्प काळातच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पाटबंधारे विभागाने खोदकाम करून त्यातून निघणारी माती, मलबा, दगड हटवून शेतकऱ्याच्या शेत जमिनी मोकळ्या करून देण्याची जाग अद्याप का आली नाही, असा प्रश्न पीडित शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कालव्याचे खोदकाम करताना मक्तेदारांनी खोदकामातून निघणारा मलबा त्याचवेळी इतरत्र हलविणे गरजेचे होते. तसे दिशानिर्देश संबंधित पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अंमलदारानी खोदकाम करते वेळीच निगा राखून सुपीक शेतजमिनी मोकळ्या करून देणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी आणण्याचे यंत्र न बनवता या योजनेला मलई खाण्याचे यंत्र बनविण्यात आले, असा पीडित शेतकऱ्यांचा आरोप आहे. या गाव परिसरात कोणत्याही दिशेला जमिनीचे बाजारभाव गगनाला भिडले असल्याने सामान्य शेतकरी कधी स्वप्नातही शेतजमिनी खरेदी करण्याचे विचार करीत नाही. आजच्या काळात या गावाच्या परिसरात शेतजमिनीचे बाजारभाव १५ ते २० लाख रुपये प्रति एकरावर असून खरेदी करणे गरजंूना भाग पडत असले तरी पाटबंधारे विभागाने येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या किमती कवडीमोल ठरवून काही शेतकऱ्यांना मोबदला दिला. तुटपुंजे पैसे काही शेतकऱ्यांना दिले तर बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला देण्यात आलेला नाही. पीडित शेतकऱ्यांनी जी रक्कम मिळत आहे ती रक्कम मुकाट्याने घेतली. पाटबंधारे विभागाच्या मार्फत शेतकऱ्याच्या शेतजमिनीत माती मलबा असल्यामुळे शेतकऱ्याचा जमिनी नापीक आल्या म्हणून पाटबंधारे विभागाने ठरावीक कालावधीचा शेत भाडा दिला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात विभागाने स्वहित साधून आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना किराया भाडे देण्यात आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात घोडचूक करूनच निधी वितरित करण्यात आली. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना विभागाने जाणीवपूर्वक किराया भाड्यापासून वंचित केले आहे. खोदकामापूर्वी शेतकऱ्याचा बांधावर बऱ्याच जातीचे मौल्यवान वृक्षांची संख्या होती त्या वृक्षांना यंत्राच्या साहाय्याने क्षणार्थ धरतीवर लोटवून तोडण्यात आले. मात्र त्या वृक्षाचा मोबदला अजून शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. ज्या जमिनीत एकही वृक्ष नव्हते त्याठिकाणी वृक्षांची संख्या दर्शावून मर्जीतील लोकांना मोबदला देण्यात आला. पाटबंधारे विभागाने या शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यात कसलीच कसर सोडली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)