एकत्रित अहवालासाठी रखडली शेतकऱ्यांची मदत
By Admin | Updated: December 23, 2016 00:46 IST2016-12-23T00:46:30+5:302016-12-23T00:46:30+5:30
शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यावर्षीही खरीप हंगामात पूर, गारपीट व

एकत्रित अहवालासाठी रखडली शेतकऱ्यांची मदत
खरीप हंगामातील नुकसान : यंत्रणेची लालफितशाही
गोंदिया: शेतकऱ्यांना अस्मानी संकटांचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यावर्षीही खरीप हंगामात पूर, गारपीट व अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ६३४.२८ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान होणारा सालेकसा तालुका आहे. त्या पाठोपाठ आमगावचा क्रमांक आहे. देवरी व सडक अर्जुनी या दोन तालुक्यातील नुकसान नगण्य आहे. गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या चार तालुक्यातील एकही नुकसान नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सालेकसा तालुक्यातील ७८४ शेतकऱ्यांचे ४९६.९३ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत ६६ लाख ८४ हजार ४३५ रुपये आहे. आमगाव तालुक्यातील २४८ शेतकऱ्यांचे १२९.९५ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत ८ लाख ८३ हजार ६६० रुपये आहे. देवरी तालुक्यातील १६ शेतकऱ्यांचे ३.७० हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत २५ हजार १६० रुपये आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील ११ शेतकऱ्यांचे ३.७० हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले. त्याची किमत २५ हजार १६० रुपये आहे.
या चार तालुक्यातील १ हजार ५९ शेतकऱ्यांच्या ६३४.२८ हेक्टर शेत पीकाचे नुकसान झाले असून त्याची किमत ७६ लाख १८ हजार ४१५ रुपये आहे. सदर नुकसान जुलै ते नोव्हेंबर या काळातला असून ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणने आहे.(तालुका प्रतिनिधी)