शेतकऱ्यांनो, भाजपाच्या काळात आले का अच्छे दिन?
By Admin | Updated: June 28, 2015 01:18 IST2015-06-28T01:18:17+5:302015-06-28T01:18:17+5:30
धानाला ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, ...

शेतकऱ्यांनो, भाजपाच्या काळात आले का अच्छे दिन?
पटेलांचा सवाल : विविध ठिकाणी निवडणूक प्रचारसभा
गोंदिया : धानाला ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, असे म्हणत शेतकरी बंधुनो, भाजपाच्या काळात आपल्यासाठी अच्छे दिन आलेत काय, असा प्रश्न राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात जाहीर सभामध्ये विचारला.
खा.पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महागाई प्रचंड वाढली, सर्वसामान्यांच्या जेवणातून दाळ तर गायबच झाली आहे. हेच आहेत का आपल्यासाठी अच्छे दिन, असा खोचक सवाल पटेल यांनी विचारला.
केंद्रातील सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याचे केवळ स्वप्न दाखविले. आपल्या भागातील किती युवकांना रोजगार मिळाला? या सरकारने युवकाची फसवणुक केली. भूमि अधिग्रहण हा कायदा आणून शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचे षडयंत्र हे भाजपा सरकार करीत आहे.
आपल्या जिल्ह्यासाठी वर्षभरात नवीन रेल्वे मिळाली काय, खत व बियाण्यांची कमतरता दूर झाली काय? असे प्रश्न विचारत प्रफुल्ल पटेल यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली.
शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक व आपणासर्वांची फसवणूक करणाऱ्या या भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धडा शिकवून नेहमी विकासाची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)