थकीत रकमेसाठी शेतकऱ्याचे उपोषण
By Admin | Updated: February 8, 2016 01:53 IST2016-02-08T01:53:02+5:302016-02-08T01:53:02+5:30
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला चार वर्षापूर्वी शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत बांधावर झाडे लावण्यासाठी कलमांचा पुरवठा करणाऱ्या ...

थकीत रकमेसाठी शेतकऱ्याचे उपोषण
कृषी विभागाला पाझर फुटेना : शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा
अर्जुनी-मोरगाव : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला चार वर्षापूर्वी शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत बांधावर झाडे लावण्यासाठी कलमांचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे भुगतान झाले नाही. संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून अखेर निराश झालेल्या त्रस्त शेतकऱ्याने आपली रक्कम मिळावी यासाठी शुक्रवारपासून (दि.५) शेतामध्येच आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे रक्कम न मिळाल्यास येत्या दोन दिवसांत आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधवार विविध जातींची झाडे लावण्याची योजना चार वर्षापूर्वी राबविण्यात आली होती. झाडे लावण्यासाठी कलमांचा पुरवठा करण्याचे कंत्राट लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील मंगलमूर्ती रामदास येरणे (६८) यांच्या फळरोपवाटीकेला देण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला पुरवठा केलेल्या कलमांची रक्कम लाखोंच्या घरात आहे. पैसे मिळाले नाही म्हणून मंगलमुर्ती येरणे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया व तहसीलदारांना वेळोवेळी भेटून व निवेदन देऊन पैसे देण्याची मागणी केली.
मात्र कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करण्यास धन्यता माणली. अखेर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मंगलमूर्ती यांनी गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये अन्न त्याग करून शुक्रवारपासून (दि.५) आमरण उपोषण सुरू केले. कृषी विभागाला झाडाच्या कलमा पुरवठा करणारा शेतकरी उपोषणावर बसल्याची माहिती कळताच तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी आर.के. चांदेवार यांनी आसोला येथील शेतामध्ये जावून त्यांची भेट घेतली. उपोषणाचा मार्ग सोडून चर्चेतून तोडगा काढू असे कृषी अधिकऱ्यांनी सांगूनसुध्दा मंगलमूर्ती यांनी आपला निर्णय बदललेला दिसत नाही.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या निर्धारासंबंधी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांना शनिवारी (दि.६) कळविले. कृषी विभागाने पुरवठा झालेल्या झाडाच्या कलमांची लाखोच्या घरात असलेली रक्कम दोन दिवसात मिळाली नाही तर आपण आत्महत्या करू असा निर्धार शेतकरी मंगलमूर्ती येरणे यांनी केल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पत्रात नमूद केले आहे. (शहर प्रतिनिधी)