जोडधंद्यातून साधणार शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती
By Admin | Updated: May 10, 2015 00:04 IST2015-05-10T00:04:43+5:302015-05-10T00:04:43+5:30
जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे धानाच्या शेतीवर अवलंबून आहेत. वास्तविक येथे अनेक प्रकारच्या जोडधंद्याला चांगला वाव आहे.

जोडधंद्यातून साधणार शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती
जिल्हाधिकारी सूर्यवंशी : जून अखेरपर्यंत भरणार रिक्त पदे
मनोज ताजने गोंदिया
जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे धानाच्या शेतीवर अवलंबून आहेत. वास्तविक येथे अनेक प्रकारच्या जोडधंद्याला चांगला वाव आहे. त्याला प्रोत्साहन देऊन आणि पिक पद्धतीत बदल करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यावर भर देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळल्यानंतर डॉ.सूर्यवंशी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी म्हणून गोंदियात रुजू झाले. जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख या नात्याने गोंदिया जिल्ह्यात कोणकोणत्या बाबतीत विकासाला संधी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणेकडून त्या संधींचा योग्य वापर ते कसा करून घेणार यावर ‘लोकमत’ला जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मुलाखत दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, सुदैवाने गोंदिया जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे पिण्याच्या पाण्याची भीषण अशी टंचाई नाही. परंतू गावागावात असलेल्या मामा तलावांच्या, नद्यांच्या, धरणांच्या पाण्याचा सुद्धा शेतकरी पुरेपूर उपयोग घेत नाहीत. काही गावांच्या शेजारी नदी असताना त्या पाण्याचा शेतीसाठी वापर केल्या जात नाही. जिल्ह्यात खरीपाच्या तुलनेत रबीचे क्षेत्र १० टक्केही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित करून उपसा सिंचन योजनेद्वारे पाण्याचा योग्य वापर त्यांनी करावा यासाठी प्रोत्साहन देण्यावर आपला भर राहणार आहे. कारण खरीप हंगामापेक्षाही रबी हंगामातील पिकाचा दर्जा आणि उतारा चांगला असतो.
जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्योत्पादन, मत्स्यबीज निर्मिती, भाजीपाल्याचे क्षेत्र वाढविणे, फूलशेती, तसेच पपई, केळी यासारखे ‘कॅश क्रॉप’ घेण्यावर भर दिला जाईल. याला प्रोत्साहन दिल्यास हा माल दुसऱ्या जिल्ह्यात किंवा मोठ्या शहरात पाठवून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासंदर्भातही आपण विचार सुरू आहे.
गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मच्छीबाजार लावता येईल का, तसेच पोल्ट्री फार्म आणि दुग्धोत्पादन यावरही भर देणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी म्हणाले.
मामा तलावांमधील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी आणि त्यांचा योग्य वापर होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून १२० मामा तलावांचे खोलीकरण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात उद्योगांचीही कमतरता आहे. वास्तविक मोठे उद्योग येण्यासाठी दळणवळणाची साधने असणे सर्वात महत्वाचे आहे. गोंदिया रेल्वे ट्रॅकवर आहे. भविष्यात विमानतळाचाही विकास होईल. त्यामुळे पुढील काळात येथे उद्योगांना चालना देण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भातही आपण अभ्यास करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्पासारखे वनक्षेत्र, हाजरा फॉल, कचारगडची गुफा अशी नैसर्गिक देण असतानाही पर्यटक पाहीजे त्या प्रमाणात आकर्षित होत नाहीत, याचे कारण सांगताना त्यांना तिथे उपलब्ध नसलेल्या सुविधा आणि या स्थळांच्या मार्केटिंगचा अभाव ही प्रमुख कारणे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले. मात्र आता नवेगाव, नागझिरा, बोदलकसा या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध केल्या जात आहेत. हाजराफॉलला अॅडव्हेंचर स्पोटर््स सुरू करणार आहोत. नवेगावचे गार्डनही लवकरच पर्यटकांच्या सेवेत हजर होईल.
त्यामुळे कोणत्याही प्रकारे पर्यटकांची गैरसोय होणार नाही. एवढेच नाही तर मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रेल्वे स्थानकावर, विमानतळांवर येथील वनपर्यटनाची जाहीरात केली जाईल. त्यामुळे पर्यटक निश्चितपणे आकर्षित होतील, असा विश्वास डॉ.सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांची कमतरता आहे. सर्वच विभागात ही उणिव असल्यामुळे कामे करताना अडचणी जातात. येथे बदली झालेले अधिकारी परस्पर बदली रद्द करून आणतात. परंतू आता मुख्यमंत्र्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. नव्याने शासकीय सेवेत ेयेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना पहिल्यांदा विदर्भात आपली सेवा देणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे येत्या जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या जातील, असे जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.