रास्ता रोको आंदोलनात शेतकर्यांची दांडी
By Admin | Updated: May 15, 2014 01:32 IST2014-05-15T01:32:31+5:302014-05-15T01:32:31+5:30
सर्व राजकीय पक्ष व शेतकर्यांच्या वतीने बुधवारी येथे रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता न अडविताच हे आंदोलन समाप्त करण्यात आले

रास्ता रोको आंदोलनात शेतकर्यांची दांडी
रास्ता रोको झालाच नाही : आंदोलनात भाजप-सेनेची उपस्थिती
अर्जुनी/मोरगाव : सर्व राजकीय पक्ष व शेतकर्यांच्या वतीने बुधवारी येथे रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता न अडविताच हे आंदोलन समाप्त करण्यात आले. या आंदोलनात केवळ भाजपा व शिवसेना कार्यकर्तेच उपस्थित होते. १९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.
स्थानिक टी प्वॉईंट येथे बुधवारी दुपारी १ वाजता भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी उन्हाळी धानाची आधारभूत हमी भावाने खरेदी केली जात होती. मात्र महाराष्ट्र शासनाने ८ मे २0१४ रोजी एक परिपत्रक काढून १५ मे पासून धान खरेदी बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे खासगी व्यापारी एक हजार ते १२00 रुपये दराने धान खरेदी करीत आहेत. यात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे शासनाने हे परिपत्रक रद्द करून हमी भावाने खरेदी करावी व शेतकर्यांना २00 रुपये प्रति क्विंटल बोनस स्वरूपात द्यावा यासाठी हे आंदोलन होते. आ. राजकुमार बडोले यांनी मागण्यांचे हे निवेदन तहसीलदार संतोष महाले यांना दिले. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भागवत उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांतर्फे आंदोलनाच्या काही दिवसांपूर्वी एक जाहीर निवेदन प्रकाशित करण्यात आले होते. यात काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी पक्षाच्या तालुकाध्यक्षांची नावे नमूद होती.मात्र या आंदोलनात ते किंवा त्यांचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते. हे आंदोलन शेतकर्यांच्या सुविधेसाठी हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी असले तरी यावेळी शेतकरी उपस्थित झाले नाही. केवळ भाजपचे ६0 ते ७0 कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. साकोलीचे आ. नाना पटोले हे सुध्दा अनुपस्थित होते. यावरून शेतकरी समाधानी मात्र राजकारणीच व्यथीत असा प्रकार या आंदोलनातून दिसून आला.
आ. बडोले व काही भाजप कार्यकर्त्यानी भाषण ठोकले. भाषणानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी उपस्थितांची अपेक्षा होती. मात्र रस्ता न अडविताच आंदोलनाची येथेच सांगता झाली अशी उद्घोषणा भाजपचे लायकराम भेंडारकर यांनी केली.
आंदोलनकर्ते पळपुटे निघाल्याचा सूर आंदोलन स्थळी उपस्थित जमावात व्यक्त केला जात होता. १९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची उद्घोषणा करण्यात आली. शासनाने १५मे पासून धान खरेदी बंद करण्याचे परिपत्रक काढले असले तरी प्रत्यक्षात ९ मे पासून खरेदी बंद झालेली आहे. काही एजन्सीचे संचालक मात्र या आंदोलनात सहभागी झाले होते हे विशेष. रास्ता रोको न होण्यामागे आचारसंहितेचे कारण सांगण्यात येत होते.मात्र आचारसंहिता सुरू असतांना शासनाचे परिपत्रक जारी होऊ शकते तर आंदोलन का होऊ शकत नाही, अशा प्रतिक्रीया आंदोलन स्थळी व्यक्त करण्यात येत होत्या.
या आंदोलनप्रसंगी माजी आ. दयाराम कापगते, डॉ. गजानन डोंगरवार, नामदेव कापगते, रघुनाथ लांजेवार, अशोक चांडक, लूनकरण चितलंगे, शैलेश जायस्वाल, संजय पवार, अजय पालीवाल, किरण कांबळे, पोमेश्वर रामटेके, केवळराम पुस्तोडे, काशिम जमा कुरैशी, मधुकर मरस्कोल्हे, मुरलीधर ठाकरे, किशोर तरोणे, अमरदास खोब्रागडे, राजू पालीवाल, नविन नशिने व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)