उद्योजक तुपाशी शेतकरी मात्र उपाशी
By Admin | Updated: October 17, 2015 02:24 IST2015-10-17T02:24:57+5:302015-10-17T02:24:57+5:30
राज्य सरकारने शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली. त्या गावांना शासकीय मदत दिली जाणार आहे.

उद्योजक तुपाशी शेतकरी मात्र उपाशी
गोंदिया : राज्य सरकारने शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली. त्या गावांना शासकीय मदत दिली जाणार आहे. मात्र त्यात गोंदिया जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
राज्य सरकारने यावर्षी सुरूवातीला पैसेवारी ६५ पैसेपेक्षा कमी असणाऱ्या गावांना दुष्काळसदृश संबोधण्याचा निकष लावला होता. त्यात जिल्ह्यातील काही गावे बसलीही होती. मात्र नंतर पुन्हा ५० पैशांचा निकष लावून नजरअंदाज पैसेवारी काढण्यात सांगितले. त्यात मात्र जिल्ह्यातील एकही गाव बसले नाही.
एकीकडे यावर्षी वार्षिक सरासरीच्या ७५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे यावर्षी कीडींचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये भाववाढ दिली असून खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतही आदेश काढलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
मुख्यमंत्री आज येणार?
राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने गोंदियात आयोजित तांदूळ व दाळ मिलिंगवरील साहित्याच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ११ वाजता गोंदियात येत आहेत. यावेळी ते राईस मिलर्सकरिता सवलतीच्या दरात वीज देण्यासोबत उद्योजकांसाठी काही घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा अधिकृत दौरा सायंकाळपर्यंत आला नव्हता.