आजही त्यांची खिचडी एकातच
By Admin | Updated: May 15, 2014 01:30 IST2014-05-15T01:30:09+5:302014-05-15T01:30:09+5:30
आज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे.

आजही त्यांची खिचडी एकातच
गोंदियातले जगताप कुटुंब : चार भावांचा परिवार साथ-साथ
कपिल केकत■ गोंदिया
आज भाऊच भावाच्या जीवावर उठला आहे. संपत्ती व स्वार्थापुढे नाते संबंध फिके पडताहेत. यातूनच परके तर सोडाच मात्र भाऊचं भावाचा गळा कापत आहे. असे असतानाही मात्र कोठेतरी रक्ताच्या नात्यांतली ही गाठ आजही सैल झाली नसल्याचे बघावयास मिळत आहे. याचेच एक मुर्त उदाहरण येथील सिव्हील लाईन्स भागातील जगताप कुटुंब आहे. चार भावांचे हे कुटुंब आजही संयुक्त नांदत आहे. आजही त्यांची खिचडी एकातच असून येणार्या भावी पिढीसाठी आज या जगताप कुटुंबाचे आदर्श म्हणून उदाहरण दिले जात आहे.
या कुटुंबाचा परिचय असा, गोपाळराव जगताप यांचे हे कुटुंब आहे. सन १९२५ मध्ये जवळील ग्राम चुलोद येथे वास्तव्यास असलेल्या गोपालराव जगताप यांचे १९४६ मध्ये गंगाबाई यांच्यासोबत लग्न झाले. रेल्वे विभागात कार्यरत गोपाळराव लग्ना नंतर सन १९४७ मध्ये गोंदियात स्थायी झाले. पुढे गंगाबाईंनी महेश, महादेव, वासुदेव, राजेंद्र, अनिल व विजय या सहा मुले आणि कमल व छाया या दोन मुलींना जन्म दिला. मुले जेमतेम मोठी होतच होती कि १९७२ मध्ये गोपाळरावांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी महादेव हेच नोकरीवर होते व गोपाळरावांनंतर परिवाराची जबाबदारी आली ती आई गंगाबाई व थोरले सुपुत्र महेशराव यांच्यावर. मात्र महेश जगताप यांनी हि जबाबदारी उत्तमरित्या पेलली. बघता-बघता मुले-मुली मोठी झाली. महेश व राजेंद्र हे रेल्वे विभागातच नोकरीला लागले. तर वासुदेव यांना वडिलांच्या जागी नोकरी लागली. महादेव हे येथील धोटे प्रेसमध्ये कार्यरत आहेत.
महेशरावांनी आपल्या थोरलेपणाचा परिचय येथेच दिला. त्यांनी सर्व धाकट्या भाऊ व बहिणींचे लग्न अगोदर उरकले व त्यानंतर शेवटी आपला विवाह केला. आज भावांमधील सर्वात धाकटे भाऊ अनिल व विजय यांचे निधन झाले असून चौघा भावांचाच परिवार गोंदियात वास्तव्यास आहे. चौघे भावंड चांगले कमावते असले तरिही त्यांचा घराचा पूर्ण कारभार आजही गंगाबाईं कडेच आहे. महेशरावांचे तसे घरातील सर्व भाऊ व सुनांना आदेशच आहे. विशेष बाब म्हणजे घरातील चारही सुना माला, उमा, कुंदा व नीताताई या सख्या बहिणींप्रमाणे एकत्रीत नांदत आहेत.
यात महेश-मालाताईंना मिलिंद व भाग्यश्री, महादेव-उमाताईंना अंजली, वासुदेव-कुंदाताईंना मंजूषा, विवेक व कीर्ती तर राजेंद्र-नीताताईंना वैभव व कल्याणी ही अपत्य आहेत. यातील फक्त वैभव व कल्याणी हे शिक्षण घेत असून उर्वरितांचे लग्न झाले असून मुली आपल्या घरी सुखात नांदत आहेत. १९४७ पासून हा परिवार सिव्हिल लाईन्समध्येच वास्तव्यास असून त्यांच्या या संयुक्त कुटुंबामुळे शहरातही त्यांची वेगळी ओळख आहे.
आज गंगाबाई ८४ वर्षांच्या आहेत. तरीही त्यांच्या आदेशानुसारच अख्या कुटुंबाची गाडी चालत आहे. यात वासुदेव घरचा सर्व कारभार मागील पाच वर्षांपासून बघत आहेत. तोही मात्र आई व महेशरावांच्या मार्गदर्शनातच. यांची मुले मोठी झाली, त्यांचे लग्न व अपत्य झाली असून त्यांच्यातही तीच आपुलकी बघावयास मिळते.
आजही एखादा कार्यक्रम किंवा कर्तव्य असल्यास ते कुणा एका भावाच्या मुला-मुलीचेच नसून चौघा भावांसाठीचे आहे. या भावंड व त्यांच्या पत्नींमधील ही आपलुकीच आहे ज्यामुळे एवढा मोठा परिवार एकत्रीत राहत आहे. एका इमारतीतच ते सोबत राहत नसून त्यांचा स्वयंपाकही एकातच आहे. आज सुमारे १५ सदस्यांचा परिवार येथे आहे. त्यातील काही नोकरीमुळे बाहेर आहेत. मात्र सणासुदीला सर्व एकत्र आल्यावर जगताप परिवाराच्या या इमारतीतली गर्दी देखण्याजोगी असते.
कुटुंबातील एकी हीच आमच्या विकासाची किल्ली आहे. कुटूंबात एकता असली तर एक शक्ती सोबत असते. घरातील मोठय़ांचा मान ठेवा, त्यांच्या मार्गदर्शनात राहावे हाच संदेश महेश जगताप या पिढीला देतात.