एक कोटीच्या नुकसानीचा अंदाज
By Admin | Updated: December 23, 2016 00:25 IST2016-12-23T00:25:12+5:302016-12-23T00:25:12+5:30
गोंदियाच्या हॉटेल बिंदलला लागलेल्या आगीनंतर या घटनेची कारणमिमांसा शोधण्याच्या कामी प्रशासकीय

एक कोटीच्या नुकसानीचा अंदाज
दिवसभर सुरु होता पंचनामा : रात्रीपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल नाही
गोंदिया : गोंदियाच्या हॉटेल बिंदलला लागलेल्या आगीनंतर या घटनेची कारणमिमांसा शोधण्याच्या कामी प्रशासकीय यंत्रणा लागली आहे. गुरूवारी दिवसभर सहायक निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यात अनेक गोष्टी समोर आल्या. दरम्यान या आगीत एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गुरूवारी दिवसभर अनेक लोकांनी गोरेलाल चौकात येऊन जळालेल्या हॉटेलची पाहणी केली. चौकात दिवसभर लोकांची गर्दी होती. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक खोळंबत होती.
सायंकाळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी हॉटेलची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, सहायक पो.अधीक्षक संदीप पखाले, दोन्ही एसडीपीओ आणि शहर ठाण्याचे निरीक्षक दिनेश शुक्ला उपस्थित होते. या घटनेमागे कोणता घातपात तर नाही ना? या शंकेची त्यांनी चाचपणी केली. दरम्यान विविध यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालानंतर या घटनेत कोणाचा दोष आहे हे निश्चित होईल असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत कोणावही गुन्हा दाखल झाला नव्हता. (जिल्हा प्रतिनिधी)
संपूर्ण हॉटेलमध्ये दोनच अग्निशमन बंब
४या हॉटेलमध्ये केवळ दोन अग्निशमन बंब भिंतीला टांगून असल्याचे पोलिसांना आढळले. याशिवाय दुसरी कोणतीही व्यवस्था तिथे नव्हती. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापनाने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे समोर आले.
४जळालेल्या झी महासेलमध्ये चार सिलींडर फाटलेले तर हॉटेल बिंदलमध्ये २ सिलींडर फाटलेले आढळले. पोलिसांनी चारही मजल्यावर पंचनामा केला. संपूर्ण इमारत जळून खाक झाल्यामुळे ही इमारत पुन्हा वापरता येणार किंवा नाही याचीही तपासणी करावी लागणार आहे.
पालकमंत्र्यांनी केली सांत्वना
४बिंदल प्लाझा या हॉटेलच्या आगीत सात व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात इमारतीत असलेल्या विविध दुकानातील वस्तु व साहित्य जळून खाक झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसानही झाले. या दुर्घटनास्थळाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. मृतकांच्या नातेवाईकांच्या घरी सुध्दा पालकमंत्र्यांीन भेट देवून सांत्वन केले. त्यात प्रामुख्याने ज्या घरचे जावई या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले त्या अजमेरा परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदतही जाहीर केली. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते.
४पालकमंत्र्यांनी या घटनेनंतर फायर आॅडिट करण्याचे सूचविले होते. त्यादृष्टीने फायर आॅडिट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोंदियात अनेक इमारती नियमबाह्य आहे. त्यांच्याकडे परवानगी नाही. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हॉटेल बिंदल हेसुद्धा एका भाजप पदाधिकाऱ्याच्या पुतण्याचे आहे. त्यामुळे कारवाई होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे.
अजमेरा परिवाराला भेट देऊन त्यांचे सांत्वन करताना पालकमंत्री बडोले, सोबत इतर स्थानिक पदाधिकारी.