भाजपात उत्साह, राष्ट्रवादीत रस्सीखेच
By Admin | Updated: June 11, 2014 23:17 IST2014-06-11T23:17:27+5:302014-06-11T23:17:27+5:30
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देणारा तिरोडा हा एकमेव मतदार संघ आहे.

भाजपात उत्साह, राष्ट्रवादीत रस्सीखेच
नितीन आगाशे - तिरोडा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य देणारा तिरोडा हा एकमेव मतदार संघ आहे. तरीपण मताधिक्यातील फरक गेल्या लोकसभा
निवडणुकीच्या तुलनेत यावेळी बराच कमी झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
तिरोडा विधानसभा क्षेत्र हे १९६२ ते १९९० पर्यंत काँग्रेसचा गड राहिले आहे़ याला अपवाद फक्त १९८५ ची निवडणूक अपवाद होती. २००९ च्या निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते डॉ.खुशाल बोपचे यांनी अवघ्या ६२३
मताधिक्याने ही निवडणूक जिंकून तिरोडा विधानसभेवर भाजपाचा झेंडा रोवला. हा मतदार संघ १९७८ पासून २००४ पर्यंत अनुसूचित जाती वर्गाकरीता आरक्षित होता़ सुमारे ३१ वर्षांनंतर आरक्षणमुक्त झाल्यामुळे या क्षेत्रात बहुसंख्य असलेल्यापोवार
समाजाला संधी मिळाली़ तसे पहिले असता दिलीप बन्सोड आमदार असताना तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सहकार्यामुळे तिरोडा विधानसभा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात विकास कार्ये झालीत. त्यांची कारकीर्दही चांगली मानली जाते़ मात्र २००४
च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरक्षणमुक्तीच्या मुद्यावर त्यांना पुन्हा संधी देऊ शकला नाही़ परिणामी गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला थोड्या फरकाने ही जागा गमवावी लागली.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांना फक्त तिरोडा विधानसभा क्षेत्रात थोडे का होईना मताधिक्य आहे़ नगर परिषद क्षेत्र राष्ट्रवादीला अनुकून दिसून येते़ नगर पालिकेत १७ पैकी १५ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत़ लोकसभा
निवडणुकीतील यश व केंद्रातील भाजपाचे सरकार पाहता भाजपाचे नेते व कार्यकर्ते अतिशय उत्साहात आहेत़ मात्र आ़. खुशाल बोपचे यांचे वास्तव्य गोरेगाव येथे असल्याने आणि ते तिरोडा येथे जास्त वेळ देऊ शकत नसल्याने कार्यकर्ते काहीसे दुरावल्याचे
दिसून येते. तुलनात्मकदृष्टया त्यांची कारकीर्द समाधानकारक मानली जात नाही़ ते विरोधी पक्षाचे आमदार असणे हे देखील कारण असू शकते़ तरीसुद्धा भाजपाकडून त्यांची दावेदारी मजबुत मानली जाते़ पक्षश्रेष्ठींनी चेहरा बदलविण्याचे ठरविल्यास त्यांचे
पूत्र व भाजयुमोचे पदाधिकारी रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांना या मतदार संघात उतरविले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. याशिवाय जि़प़ बांधकाम समितीचे माजी सभापती विजय रहांगडाले, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन हे दावेदार मानले जातात.
राष्ट्रवादीतून माजी आ.दिलीप बन्सोड, डॉ.सुशील रहांगडाले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष व जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर हे दावेदार आहेत. यात गतवेळी अवघ्या ६२३ मतांनी पराभव पत्करल्यामुळे डॉ.रहांगडाले दावा करीत आहेत. एक महिला
उमेदवार म्हणून संधी मिळण्यासाठी राजलक्ष्मी तुरकर प्रयत्नशील आहेत तर मतदार संघात सदैव सक्रिय राहात असल्यामुळे दिलीप बन्सोड यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी दिल्या गेली तर या तिघांपैकी एक जण बंडखोरी
करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तालुक्यात बसपासह शिवसेना-मनसेचे अस्तित्व फारसे राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दावेदारी करण्यास अजूनही कोणीही पुढे आलेले नाही.