संविधान बदलण्याची शक्यता समाप्त
By Admin | Updated: December 7, 2015 05:50 IST2015-12-07T05:50:53+5:302015-12-07T05:50:53+5:30
स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदेत संविधानावर दोन दिवसांपर्यंत चर्चा झाली. ही पूर्णत: समाधानकारक बाब नाही.

संविधान बदलण्याची शक्यता समाप्त
गोंदिया : स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदेत संविधानावर दोन दिवसांपर्यंत चर्चा झाली. ही पूर्णत: समाधानकारक बाब नाही. तरीसुद्धा संविधान बदलण्याची शक्यता संपली, असेच म्हणावे लागेल. आता तर संविधानात नमूद तरतुदींवर अंमल करण्यासाठी सरकारला बाध्य करायला हवे. यासाठी दलीत, आदिवासी व ओबीसी यांची एकजुट आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमघाट येथे रविवारी (दि.६) आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना खासदार पटोले यांनी, आतापर्यंत अनेकदा संविधानात संशोधन करण्यात आले. परंतुु एकदा पुन्हा हे संशोधन वंचित घटकांच्या हितार्थ झाले नाही. राज्यकर्त्यांनी देशातील सर्वाधिक लोकसंख्येला निंद्रावस्थेतच ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. आता आम्हाला जागे व्हावे लागेल असे मत मांडले.
कार्यक्रमाला आमदार गोपालदास अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायसवाल, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे सी.झेड. गजभिये, विश्व हिंदू परिषदेचे राम पुरोहित, कॉस्ट्राईबचे सतीष बंसोड, माजी प्रशासकीय अधिकारी अशोक बोरकर, अरूण गजभिये, राजेश चतुर, नीलम हलमारे, वामन गेडाम, कमल बोंबार्डे, प्रदीप ठवरे, एस.डी. महाजन, राजीव ठकरेले, पीपचंद फुले व इतर उपस्थित होते.
नगराध्यक्ष जायस्वाल यांनी, आतापर्यंत भीमघाटच्या सौंदर्यीकरणाला नगर परिषदेने नजरअंदाज केले. परंतु आता प्राधान्यतेने याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक भीमघाट स्मारक समितीचे अध्यक्ष श्याम चौरे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी लक्ष्मीकांत डहाटे, किशोर मेश्राम, सुशीला भालेराव, अशोक बोरकर, अजय चौरे, विलास वासनिक, विकास शेंडे, जयंत कुंभलवार, प्रदीप ठवरे, किशोर गजभिये, श्यामकुमार गणवीर, गौतम शेंडे, धनंजय वैद्य, चंद्रशेखर सुखदेवे व अनेकांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, बाबसाहेबांच्या अस्थिंना वंदन करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळली होती. (प्रतिनिधी)
२५ लाखांचा निधी देण्याची घोषणा
४ खासदार निधीतून २५ लाख रूपये भीमघाटच्या सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध करवून देण्याची घोषणा आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार नाना पटोले यांनी केली. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी ही घोषणा केली होती.