आरती इन्फ्रास्ट्रक्चरचे वनजमिनीवर अतिक्रमण
By Admin | Updated: August 27, 2015 02:03 IST2015-08-27T02:03:05+5:302015-08-27T02:03:05+5:30
वनविभागाच्या परवनागीशिवाय टिचभरही वनजमीन वापरता येत नाही, परंतु कोहमारा-नवेगाव रस्त्याला लागून

आरती इन्फ्रास्ट्रक्चरचे वनजमिनीवर अतिक्रमण
विनापरवाना साहित्य टाकले : वीज कंपनीकडून दिली थ्री फेज मीटर जोडणी
गोंदिया : वनविभागाच्या परवनागीशिवाय टिचभरही वनजमीन वापरता येत नाही, परंतु कोहमारा-नवेगाव रस्त्याला लागून असलेल्या वनविभागाच्या जागेवर वीज वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशनच्या उभारणीसाठी नागपूरच्या आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने नियमबाह्यरित्या हे अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कोहमारा-नवेगाव रस्त्यावरील गट क्र. २८०, १६ वर आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वीज कंपनीसाठी पॉवर हाऊस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आणले आहेत. एवढेच नाही तर कंपनीने या गटाच्या जागेवर तारांचे कुंपन केले आहे. विटा सिंमेंटच्या पक्क्या खोल्या तयार केल्या आहेत. ६० हजार चौरस फुट वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून त्या ठिकाणी साहित्य आणून ठेवण्यात आले आहे.
वनविभागाची जमीन वापरताना वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. वनविभागाची परवानगी नसताना वीज कंपनीने आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नागपूरला औद्योगिक वापरासाठी तीन फेजची लाईन दिली आहे. या कामासाठी खोटे दस्तावेज जोडण्यात आले असावे अशी शंका घेतली जात आहे. महावितरण कंपनी मालकीच्या जागेचा सातबारा देऊनही शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देत नाही, उलट सातबारा नसलेल्या ठिकाणी आणि अतिक्रमित जागेवर तीन फेज लाईन कशी देण्यात आली हे न उलगडणारे कोडे आहे. याची साधी चौकशी करण्याचे सौजन्य विद्युत वितरण कंपनीने दाखविले नाही.
आदिवासी वनहक्क समितीअंतर्गत दावा मंजूर केल्यानंतर आरती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला भाडे तत्वावर ही जागा दिली असेल तर त्या शेतकऱ्याने नियोजनबध्द पध्दतीने भूमीअधिग्रहण केल्याचे सिध्द होते. ज्या व्यक्तीला ही जमीन दिली असेल आणि ती व्यक्ती दुसऱ्याला ती जागा भाडेतत्वावर देत असेल तर त्या व्यक्तीला त्या जमिनीची गरज नाही असा त्याचा अर्थ होतो. शेतीसाठी देण्यात येणाऱ्या जमीनीचा उद्योगासाठी वापर करता येत नसताना हा प्रकार सर्रास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)