ंनिवडणूक अर्ज छाणनीत घोळ
By Admin | Updated: May 22, 2015 02:07 IST2015-05-22T02:07:58+5:302015-05-22T02:07:58+5:30
पालडोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक अर्ज छाणनीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणा केला जात आहे.

ंनिवडणूक अर्ज छाणनीत घोळ
इंदोरा-बु. : पालडोंगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक अर्ज छाणनीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून पक्षपातीपणा केला जात आहे. त्यामुळे अर्ज छाणनीत घोळ असून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी गणराज रहांगडाले यांनी केली आहे.
पालडोंगरी येथील सेव सहकारी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आला असून त्या अनुशंगाने पालडोंगरी येथील नागरिकांनी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे नाम निर्देशन अर्ज दाखल केले. यात सर्वसाधारण गटामधून चंद्रकुमार बळीराम चौधरी यांनी सुद्धा नाम निर्देशन पत्र दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत जे कागदपत्र जोडावे लागतात ते अर्जासोबत जोडले. यात अपत्याचे प्रमाणपत्र व सचिवांकडून अपत्य नसल्याचा पुरावा जोडण्यात आला.
१२ मे रोजी नाम निर्देशन पत्र सादर केल्यावर तक्रारकर्ते व गावातील नागरिक गणराज रहांगडाले यांनी नामनिर्देशन पत्र व अपत्याच्या दाखल्याची सत्यप्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडून मागून घेतली. यात चंद्रकुमार चौधरी यांना अपत्य नाही असे प्रमाणपत्र ग्रामसेवक रहांगडाले यांनी दिले आहे. १४ मे रोजी छाणनीच्या दिवशी तक्रारकर्ते रहांगडाले यांनी आक्षेप घेतला की चौधरी यांना दोन अपत्य असताना सुद्धा यांनी अपत्य नसल्याचा दाखला का लावला. यावर निवडणूक अधिकारी बी.डी. घरजारे यांनी स्वत:त्या दाखल्यावर खोडतोड करुन दोन अपत्य असल्याचे लिहिले. मात्र त्याच दाखल्याची सत्यप्रत याच निवडणुक निर्णय अधिकारी घरजारे यांनी दिली होती त्याच अपत्य नाही असे नमूद आहे.
तक्रारकर्ते रहांगडाले यांनी आक्षेप घेत सदर उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र रद्द करावे असे म्हटले. परंतु निवडणूक अधिकारी घरजारे यांनी नाम निर्देशन पत्र रद्द केले नाही. उलट स्वत: ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे १३ मे १५ ला अपत्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज करुन दाखला घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवार चौधरी यांनी संगमत करुन दाखल्यामध्ये खोडतोड केली आहे. सदर प्रकरणासंबंधी न्याय मिळावा व सदर उमेदवाराचे नाम निर्देशन पत्र अपात्र करण्यासाठी आक्षेप घेत वरिष्ठांकडे सुद्धा तक्रार करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक २९ मे आहे. ३० मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणुक घेणे असा निवडणूक कार्यक्रम आहे.
सदर अपत्याच्या दाखल्या संदर्भात दुसऱ्या गटाच्या उमेदवारांचे नाम निर्देशन पत्र निवडणूक अधिकारी घरजारे यांनी रद्द केले. तर चौधरी यांनी खोटा दाखला जोडला असला तरी नाम निर्देशन पत्र का रद्द केले नाही, याचा सर्व उमेदवार विचार करीत आहेत. एकीकडे सदर उमेदवाराला दोन अपत्य असताना अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र ग्राम सेवकांनी कसे दिले. तर १४ मे रोजी अपत्य असल्याचे प्रमाणपत्र तोच ग्रामसेवक कसा देतो हे न समजणारे कोडे आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडणुकीत पक्षपात करणारे नसावे असा चक्क आदेश असताना सुद्धा येथे मात्र निवडणूक निर्णय अधिकारी हेच खोडतोड करुन हेतुपुरस्सर काम करीत आहेत. त्यामुळे यांच्यावर कलम ४२० अंतर्गत कार्यवाही करुन त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पदावरुन काढण्यात यावे, व उमेदवार चौधरी यांचे नामनिर्देशन पत्र रद्द करुन त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी रहांगडाले यांनी वरिष्ठांना पत्र देऊन केली आहे. (वार्ताहर)