विविध घटनांत आठ जणांचा मृत्यू
By Admin | Updated: March 2, 2015 01:33 IST2015-03-02T01:33:44+5:302015-03-02T01:33:44+5:30
अपघात, तलावात बुडून, विहीरीत पडून, रेल्वेने कटून तसेच भाजल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आठ नोंदी मागील चार दिवसांत संबंधित पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहेत.

विविध घटनांत आठ जणांचा मृत्यू
गोंदिया : अपघात, तलावात बुडून, विहीरीत पडून, रेल्वेने कटून तसेच भाजल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आठ नोंदी मागील चार दिवसांत संबंधित पोलीस ठाण्यात घेण्यात आल्या आहेत.
गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वेस्ट कॅबीन जवळ किमी १००२/७ जवळ एका ३५ ते ४० वर्ष वयोगटातील इसमाचा रेल्वेने कटून शनिवारी मृत्यू झाला. तो साडे पाच फूट उंचीचा आहे. सदर घटनेसंदर्भात गोंदिया रेल्वे पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. तपास अजय चरडे करीत आहेत.
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोरणी शिवारात २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान मोटार सायकल घसरल्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. सुनिल धरमदेवसिंग यादव (२७)रा. दिनदयालपूर, बालाघाट असे मृताचे नाव आहे. तर राजेंद्र बी. यादव (२७) रा. पोलीस लाईन बालाघाट असे गंभीर जखमीचे नाव आहे. ते दोघेही मोटारसायकल एम पी ०५ ए डी २११० ने गोंदियावरून बालाघाट कडे जात असताना अपघात घडला. सदर घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी गुरूवारी घेतली आहे.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील तलावाच्या पाण्यात बुडून एका इसमाचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्याचा मृतदेह आढळला. इंदल गोपाल लिल्हारे (३५) रा. रतनारा असे मृताचे नाव आहे. तो गुरूवारी सकाळी ६ वाजतापासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी तलावाच्या पाण्यात आढळला. तो पक्षाघाताने ग्रस्त होता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोट येथील सुभाष हायस्कूल परिसरातील विहीरीत ६५ वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला. मयाराम तुळशीराम परतेकी (६५) रा. मुंडीकोटा असे मृताचे नाव आहे. तो बुधवारपासून बेपत्ता होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजता दरम्यान त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. तिरोडा पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा येथील उमेश कुवरलाल मेश्राम (२३) या तरूणाचा शनिवारी सकाळी ९ वाजता केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला. त्याला त्याच्या कुटुंबियांनी उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजोली येथील रोहिणी शुध्दोधन जांभूळकर (१९) ही आपल्या घरातील चुलीवर स्वयंपाक करीत असताना तिला आग आगली. यात रोहीणी गंभीररित्या भाजली. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. भाजलेल्या रोहीणीला उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. केशोरी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
गोरेगाव तालुक्याच्या चिचगावटोला येथील सुनिता दिगंबर कटरे (३२) ही महिला ४ फेब्रुवारी सकाळी ७.४५ वाजता जळाल्याने तिचा लकडगंज येथे उपचार घेताना मृत्यू झाला. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून गोरेगाव पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
तर रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खातीया येथील राजकुमार राजाराम खोटेले (२४) यांचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजता दरम्यान खातीया शेतशिवारात घडली. मृतक राजकुमार आपल्या शेतात नागरणी करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेला असता ट्रक्टर उलटल्याने ट्रॅक्टर खाली दबून त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)