शिक्षण विभाग म्हणतो तयार है हम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST2021-09-25T04:31:09+5:302021-09-25T04:31:09+5:30
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ...

शिक्षण विभाग म्हणतो तयार है हम !
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जि.प.शिक्षण विभाग शाळा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून ४ ऑक्टोबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरु केल्या जाणार आहे. त्यामुळे आता ४ ऑक्टोबरपासून तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हीच बाब लक्षात घेत आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.२४) शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात हजेरी लावणार आहेत. जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या एकूण १६६९ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण १ लाख ३३ हजार १५६ विद्यार्थी आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांचे सॅनिटायजेशन आणि रंगरगोटीचे कामसुध्दा पूर्ण झाले आहे. या सर्व शाळांमध्ये एकूण ३७६४६ शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून यापैकी जवळपास सर्व शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास कुठलीच अडचण नसल्याने शिक्षण विभागाने सांगितले.
..............
सूचनांकडे लक्ष
राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. मात्र शाळा सुरु करताना कुठल्या गोष्टी करायच्या, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन यांची मंजुरी आणि पालकांचे सहमती पत्र लागणार का? एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे यासंदर्भात शासनाच्या काय सूचना येतात यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
...............
पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. तर मागील दोन महिन्यापासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकसुध्दा कंटाळले आहे. त्यामुळे शासनाने शुक्रवारी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसल्याने काही पालकांनी काळजीसुध्दा व्यक्त केली.
..............
जिल्ह्यातील एकूण शाळा : १६६९
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्या : १,३३१५६
.......................
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची विद्यार्थी संख्या
इयत्ता पहिली : १४५६५
इयत्ता दुसरी : १८५४२
इयत्ता तिसरी : २०४७६
इयत्ता चौथी : २०४०६
इयत्ता पाचवी : १९६६४
इयत्ता सहावी : १९४४०
इयत्ता सातवी : २००६३
..............................
कोट
राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी जि.प.शिक्षण विभाग सज्ज आहे. शाळा सुरू करण्यासाठी कुठलीच अडचण नाही.
- अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी.