रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुराळा, तीन मार्गांच्या कामात कंत्राटदारांच्या दिरंगाईचा दांडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:50+5:302021-08-24T04:32:50+5:30
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात काही पक्षाचे पदाधिकारी अडथळा निर्माण करीत असल्याचे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ...

रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुराळा, तीन मार्गांच्या कामात कंत्राटदारांच्या दिरंगाईचा दांडा !
गोंदिया : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात काही पक्षाचे पदाधिकारी अडथळा निर्माण करीत असल्याचे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून एकामेकांवर आरोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातसुद्धा तीन राष्ट्रीय महामार्गांची कामे संथ गतीने सुरू असून, यात कंत्राटदारांची दिरंगाई आणि यंत्रणेचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप चारही प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे. जिल्ह्यातून सहा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यापैकी कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग, देवरी-आमगाव-गोंदिया हराष्ट्रीय महामार्ग, रायपूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील तीन-चार वर्षांपासून सुरू आहे. केवळ रायपूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील वन कायद्याची अडचण वगळता इतर दोन महामार्गांचे काम केवळ कंत्राटदारांच्या लेटलतीफ धोरणामुळे रखडले आहे.
..............
राजकारणी काय म्हणतात
देवरी-आमगाव-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या कामाचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराच्या वेळकाढू धोरणामुळे हे काम रखडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- केशव मानकर, जिल्हाध्यक्ष भाजप
............
मागील चार वर्षांपासून देवरी-आमगाव-गोंदिया, कोहमारा-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, अजूनही ते पूर्ण झाले नाही. अर्धवट बांधकामामुळे नागरिक आणि वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या कामांची गुणवत्ता दर्जेदार नाही.
- विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
...............
कंत्राटदाराने दिलेल्या कालावधीत कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, त्यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने मागील चार वर्षांपासून कोहमारा-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.
- डाॅ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
............
जिल्ह्यात सुरू असलेली राष्ट्रीय महामार्गाची कामे अत्यंत दर्जाहीन असून, तीन-चार वर्षांपासून ती अद्यापही पूर्ण करण्यात आली नाहीत. राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- मुकेश शिवहरे, जिल्हा प्रमुख शिवसेना
..........
रायपूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील आठ वर्षांपासून सुरू आहे. वन कायदा आणि भूसंपादनाअभावी या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते. मात्र, आता या महामार्गातील अडचणी दूर झाल्या असून, कामाला सुरुवात झाली आहे.
..........
कोहमारा-गोंदिया या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू असून, यात कंत्राटदाराच्या लेटलतीफ धोरणामुळे हे बांधकाम रखडले. अनेक ठिकाणी काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि इतर समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
......
देवरी-आमगाव-गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग
या रस्त्याचे
काम मागील चार वर्षांपासून सुरू कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे हे काम रखडले असून, या कामाची गुणवत्ता दर्जाहीन आहे. यासंदर्भातील तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. यासाठी आंदोलनही करण्यात आले.
...........