चारचाकी वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: May 30, 2015 01:12 IST2015-05-30T01:12:16+5:302015-05-30T01:12:16+5:30
व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात लग्नसराईमुळे विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

चारचाकी वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी
गोंदिया : व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात लग्नसराईमुळे विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. केवळ गोंदिया जिल्हाच नाही तर लगतच्या मध्यप्रदेशताली बालाघाट आणि छत्तीसगड राज्यातूनही अनेक जण येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मार्केट परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहनांची कोंडी होते. पण ही कोंडी भोंडण्यात वाहतूक नियंत्रण विभाग सपशेल अपयशी ठरत आहे.
नेहरू चौक ते दुर्गा चौक आणि गांधी चौक ते श्री टॉकेज चौक यादरम्यानचा परिसरात गोंदिया शहरातील मुख्य मार्केट आहे. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, भांडी, खेळण्याचे साहित्य, मोबाईलसह सर्व प्रकारच्या वस्तू याच मार्केटमध्ये मिळतात. त्यामुळे हे परिसर वर्षभरच गजबजलेला असतो. मात्र लग्नसराईमुळे आता बाहेरगावाहून येणाऱ्या खरेदीदारांची गर्दी जास्त आहे. अनेक जण चारचाकी वाहनांनी येतात. शहरात अधिकृतपणे वाहने पार्क करण्यासाठी कुठेही जागा नसल्यामुळे मार्केटच्या रस्त्यावरच वाहन ठेवले जाते. यामुळे त्या वाहनाच्या बाजुने उपलब्ध असणाऱ्या अल्पशा जागेतून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी होऊन कोंडी निर्माण होते. गोरेलाल चौक, खोजा मस्जिद चौकाचा परिसर या ठिकाणी तर दर १० मिनिटांनी वाहतुकीची कोंडी होते.
आधीच मार्केट परिसरातील रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून दुकाने वाढविली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद आहेत. त्यातच कोणत्याही व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर वाहन ठेवण्यासाठी पुरेसी जागा सोडलेली नाही. त्यामुळे खरेदीसाठी येणारे ग्राहकच नाही तर काही व्यापाऱ्यांची स्वत:ची वाहनेही रस्त्यावरच ठेवलेली असतात. पण भर मार्केटमध्ये रस्त्यावर एका बाजूने वाहन ठेवले तरी वाहतुकीला मोठी अडचण जाते. मात्र आश्चर्य म्हणजे कोणत्याही चारचाकी वाहनावर वाहतुकीच्या नियमानुसार कारवाई होती. त्यामुळेच बिनधास्तपणे कुठेही गाडी लावण्याची सवय नागरिकांना झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
टोविंग व्हॅनचे भिजत घोंगडे
नियमबाह्यपणे कुठेही चारचाकी वाहने पार्किंग करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांची वाहने उचलून नेऊन पोलीस ठाण्यात लावण्यासाठी दोन टोविंग व्हॅन आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष तरतूद करून त्या व्हॅन खरेदी करून दिल्या. मात्र गेल्या चार महिन्यांपासून त्या व्हॅनचा वापरच नाही. अजूनही त्या काही तांत्रिक दुरूस्तीसाठी पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट (एमटी) विभागात पडून आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेचे पो.निरीक्षक किशोर धुमाळ यांना याबाबत विचारले असता त्या व्हॅन येत्या १५ दिवसात वाहतूक नियंत्रण विभागाच्या ताब्यात दिल्या जातील असे सांगितले.
दुचाकींवरच कारवाई का?
वास्तविक दुचाकींपेक्षाही चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची जास्त कोंडी होते. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता आतापर्यंत केवळ दुचाकी वाहनांनाच टार्गेट केले जात आहे. मार्केट परिसरातील काही मार्गावर वन-साईड पार्किगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे एखादी गाडी चुकून दुसऱ्या बाजूने लागली किंवा थोडी रस्त्यावर लागली तर ती लगेच उचलली जाते. मात्र दुचाकीपेक्षा चार पट जागा व्यापणाऱ्या कारचालकाला मात्र साधा जाब विचारण्याची हिंमत वाहतूक नियंत्रण विभाग का करीत नाही? असा प्रश्न गोंदियावासीयांना पडला आहे.